Thursday, September 6, 2012

नाम परिषदेतील भारताची कमाई


१२० देशांच्या गट-निरपेक्ष आंदोलनाची (नाम) १६ वी त्री-वार्षीक परिषद् अनेक अर्थांनी महत्वपूर्ण ठरली. नव्या जागतीक परिस्थितीमध्ये गट-निरपेक्षता संदर्भहीन ठरली आहे, असा सुर अनेक अभ्यासक लावत असतांना, नाम च्या तेहेरान परिषदेस ३१ राष्ट्र-प्रमुख, इतर ८९ सदस्य देशांचे वरिष्ठ प्रतिनिधी, २० पेक्षा जास्त देशांचे निरीक्षक आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव यांनी उपस्थिती लावत या आंदोलनाचे महत्व अधोरेखीत केले. संयुक्त राष्ट्र संघटनेनंतर सर्वाधीक देशांची सदस्यता असलेल्या नाम चे अस्तित्व अणि उद्दिष्टे नेहमी वादग्रस्त ठरली आहेत. त्यात, यंदाची परिषद् इराण च्या राजधानीत भरवण्यात आल्याने त्याला संभाव्य अमेरिका-इराण आणि इस्राएल-इराण युद्धाची, तसेच अरब देशांमध्ये घडत असलेल्या राजकीय उलथा-पालथीची पार्श्वभूमी लाभली होती. भारतातर्फे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी परिषदेस हजर राहत गट-निरपेक्ष आंदोलनाप्रतीची कटीबद्धता व्यक्त केली.  या निमित्त्याने डॉ. मनमोहन सिंग यांनी, सलग तिसऱ्या नाम परिषदेस उपस्थित राहण्याचा दुर्मिळ योगसुद्धा  साधला. सन २००६ च्या हवाना परिषदेत आणि सन २००९ च्या शर्म-एल-शेख परिषदेत डॉ. सिंग जातीने उपस्थित होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी तेहेरान परिषदेच्या निमित्त्याने पुन्हा एकदा भारतासाठी असलेले नाम चे महत्व आंतरराष्ट्रीय समुदायापुढे ठसवून दिले. नाम चा संस्थापक सदस्य असणे आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या, 'महाशक्तींच्या लष्करी गटा-तटाच्या राजकारणापासून नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांना दूर ठेवण्याच्या' धडपडीचे नाम हे फलीत असणे, एवढेच या मंचाचे भारतासाठी महत्व नाही. भारताच्या आजच्या परराष्ट्र धोरणांना नाम तेवढेच पोषक आहे जेवढे २० वर्षांपूर्वी होते! 

शीत युद्ध संपले असले, तरी बड्या राष्ट्राची शीत युद्ध-कालीन मानसिकता कायम आहे. शीत युद्धानंतर अमेरिकेने नॉर्थ एटेलांतीक ट्रीटी ऑरगनायझेशन (नाटो) ला बरखास्त न करता त्या द्वारे युगोस्लाविया, अफगाणिस्तान, लिबिया या देशांमध्ये सशस्त्र हस्तक्षेप घडवून आणले. दुसरीकडे रशियाने पूर्वाश्रमीच्या सोविएत संघातील गणराज्यांशी लष्करी संधी करत नाटो ला समर्थ पर्याय उभे करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. गरीब आणि विकसनशील देशांना आपल्या फायद्यासाठी लष्करी गठबंधनात येण्यास भाग पाडायचे, तसेच आपल्याला पूरक नसणारया राजवटी सशस्त्र हस्तक्षेपाने उलटवून टाकायच्या हे बड्या राष्ट्राचे जुने धोरण अद्याप कायम असल्याने, गट-निरपेक्ष आंदोलनाची गरज आधी सारखी आजही आहे असे भारताचे मत आहे. जगात केवळ एक महासत्ता असो अथवा दोन किंव्हा त्याहून जास्त महासत्ता असो, विकसनशील देशांनी या पैकी कुठल्याही महासत्तेशी लष्करी आणि सामरिक संधी करणे हे त्यांच्या विकासाला मारक आणि स्वातंत्र्यावर घाला आणणारे ठरण्याची जास्त शक्यता आहे, हे भारताचे मत अद्याप कायम आहे. उदाहरणार्थ, भारत जर नाटो चा सदस्य असता तर भारताला अफगाणिस्तान आणि लिबिया या देशांतील सशस्त्र मोहिमांमध्ये सहभागी होणे भाग पडले असते, मग त्यात भारताचे राष्ट्रीय हित समाविष्ट असो किंव्हा नसो! विकसनशील राष्ट्रांनी बड्या राष्ट्रांच्या प्रलोभनाला, तसेच दबावाला, बळी न पडता आपले सामरिक स्वातंत्र्य जपावे या साठी गट-निरपेक्ष आंदोलनाच्या आधाराची आवश्यकता आहे. नजीकच्या भविष्यात जागतिक राजकारणात अमेरिका आणि चीन अशी दोन सत्ता-केंद्रे अस्तित्वात येण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा गट-निरपेक्ष आंदोलनाची धग कायम ठेवत, इतर देश या दोन पैकी एका देशाच्या गटात सहभागी होणार नाही हे सुनिश्चित करणे भारताच्या हिताचे आहे. 

तेहेरान परिषदेत केलेल्या भाषणात, डॉ.  मनमोहन सिंग यांनी पाश्चिमात्य देशांच्या एकतर्फी आणि मनमानी लष्करी कारवायांना असलेला भारताचा विरोध स्पष्ट करत अनेक छोट्या आणि विकसनशील देशांचा विश्वास संपादन केला. भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची चुणूक दाखवत, डॉ सिंग यांनी, येत्या काळात सिरीया मध्ये बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपाला विरोध दर्शविला. सिरीया किव्हा इतर अरब देशांमधील राजकीय बदलाची प्रक्रिया त्या-त्या देशांमधील लोकांनी आपणहून सोडवणे आवश्यक आहे, अन्यथा घडून येणारा बदल दिर्घकालीन न राहता यादवी-सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्या देशांच्या अर्थ-व्यवस्थेची राखरांगोळी होईलच, पण अल-कायदा सारख्या जहाल संघटनांना आपले जाळे पसरवण्यास मोकळा वाव मिळून आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल, या परिपक्व भूमिकेतून डॉ. सिंग यांनी भारताचे भूमिका स्पष्ट केली. या सोबत, पैलेस्तीन प्रश्नावर पैलीस्तीनी लोकांच्या स्वातंत्र्याला केंद्र स्थानी ठेऊन समाधान शोधले जात नाही, तो वर अरब प्रदेशांत शांतता राबू शकत नाही, तसेच इस्लामिक दहशतवादाचा एक प्रमुख स्त्रोत बंद होणार नाही या कडे डॉ. सिंग यांनी लक्ष वेधले.

भारताला विद्यमान जागतिक व्यवस्थेत, म्हणजे संयुक्त राष्ट्र, जागतिक बैंक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी यामध्ये, बदल घडवून आणत त्यातील आपले अधिकार आणि जबाबदारी वाढवायची आहे. या संस्थांच्या सुधारणांना बड्या राष्ट्रांकडून फारसे समर्थन प्राप्त नाही, तेव्हा हे बदल घडवून आणण्यासाठी भारताला संयुक्त राष्ट्रातील अन्य देशांच्या समर्थनाची गरज आहे. नाम परिषदेत हे समर्थन प्राप्त करण्याची संधी डॉ. सिंग यांनी गमावली नाही. आपल्या संबोधनात त्यांनी आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आजच्या परिस्थितीनुसार बदल घडवून आणत विकसनशील देशांना जास्तीत जास्त वाटा देण्याची मागणी पुढे रेटली. बड्या राष्ट्रांच्या धोरणांनुसार चालणाऱ्या जागतिक बैंक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधी वरील विकसनशील देशांचे परावलंबित्व संपवण्यासाठी,  डॉ. सिंग यांनी विकसनशील देशांच्या नव्या बैंकेची संकल्पना मांडली. भारत सदस्य असलेल्या 'ब्रिक्स' देशांच्या गटाने या संदर्भात या आधीच ठोस सुरुवात केली आहे. त्याला इतर विकसनशील आणि गरीब देशांचे समर्थन मिळवण्याचे महत्वपूर्ण काम डॉ. सिंग यांनी तेहेरान परिषदेत केले. 'ब्रिक्स' देशांपैकी केवळ भारत हा नाम चा मूळ सदस्य आहे. 'ब्रिक्स' गटातील दक्षिण आफ्रिकेने वंशवादी राजवटीच्या समाप्तीनंतर नाम चे सदस्यत्व घेतले आहे, तर ब्राझील आणि रशिया हे देश नाम मध्ये निरीक्षक आहेत आणि नाम बाबत चीन ची भूमिका नेहमीच द्विधा राहिलेली आहे. त्यामुळे इतर विकसनशील देशांचे नेतृत्व करण्याची संधी आपसूक भारताला मिळाली आहे.

नाम परिषदेच्या निमित्याने यजमान देशांशी द्वि-पक्षीय संबंध मजबूत करण्याच्या संधीचा भारताने नेहमीच पुरेपूर लाभ उचलला आहे. त्याशिवाय, इतर देशांच्या प्रमुखांशी चर्चा करणे आणि त्या-त्या देशांशी सलोखा वाढवणे या परिषदेच्या निमित्याने साध्य होते. डॉ. सिंग आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ जरदारी यांच्या भेटीबद्दल बरीच उत्सुकता होती. मात्र, या भेटीतून विशेष काही साध्य झाले नाही. फक्त, डॉ. सिंग पाकिस्तान दौऱ्यावर जातात का आणि गेले तर कधी, या बाबतची उत्सुकता आणखी ताणल्या गेली आहे. तेहेरान परिषदेच्या पार्श्वभूमीवर इराणशी झालेली व्यापक द्वि-पक्षीय चर्चा ही भारतासाठी मोठी उपलब्धी आहे. मागील काही वर्षांपासून भारताचे अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध वाढीस लागल्यानंतर इराणशी असलेल्या सलोख्याला ओहोटी लागली होती. खरे तर, इराण हा भारताचा परंपरागत व्यापारी मित्र आहे आणि आता उशिराने का होईना दोन्ही देशांनी व्यापारी संबंध पुन्हा दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या साठी, इराणने तेल-वाहू जहाजांना पूर्ण इंशुरेंस ची सोय करण्याची जबाबदारी उचलली आहे. शिवाय, तेलाच्या रक्कमेची मोठी टक्केवारी भारतीय रुपयांच्या स्वरूपात स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. याशिवाय, इराणने छबहार बंदर विकसित करण्याच्या भारताच्या  इच्छेला हिरवा कंदील दाखवला आहे. या बंदरामार्गे अफगाणिस्तानातून आयात-निर्यात करण्यासाठी योजना बनवण्यासाठी या तीन देशांची कार्य समिती स्थापन करण्यात आली आहे. भारतासाठी नाम परिषदेच्या निमित्याने घडलेल्या या महत्वपूर्ण घडामोडी आहेत. तेहेरान परिषदेवर अमेरिका आणि युरोपीय संघाची खप्पा मर्जी असली, तरी मुळात बड्या राष्ट्रांच्या मनमानीला मोकळा वाव असू नये हे गट-निरपेक्षतेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दृष्टीकोनातून, तसेच विकसनशील देशांपुढे सामुहिक अजेंडा ठेवणे आणि इराणशी द्वि-पक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या दिशेने पाऊले पडल्याने भारतासाठी तेहेरान परिषद निर्विवादपणे यशस्वी ठरली आहे. 

नाम' मध्ये काय ठेवलय?


गट-निरपेक्षता हवी आहे का; ती फायद्याची आहे  का; खरी गट-निरपेक्षता शक्य आहे का इत्यादी नेहमीच्या प्रश्नांच्या घोळात नाम ची १६ वी त्री-वार्षिक परिषद तेहरान इथे पार पडली. सन १९६१ मध्ये बेलग्रेड इथे गट-निरपेक्षता आंदोलनाची अधिकृत मुहूर्तमेढ रोवतांना सुद्धा हेच प्रश्न विचारण्यात आले होते आणि तेव्हा पासून आतापर्यंत या प्रश्नांचे पूर्ण समाधानकारक उत्तर मिळाले नसले तरी नाम ची सदस्यता सातत्याने वाढतच आहे. ज्या शीत युद्धाच्या प्रकोपासून दूर राहण्यासाठी नाम ची सुरुवात झाली होती, ते शीत युद्ध इतिहास जमा झाले असले तरी नाम अद्याप कायम आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस इराणची राजधानी तेहेरान इथे भरलेल्या १६ व्या नाम परिषदेस ३१ राष्ट्र-प्रमुख, इतर ८९ सदस्य देशांचे वरिष्ठ प्रतिनिधी, २० पेक्षा जास्त देशांचे निरीक्षक आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव हजर होते. रशियाने परिषदेस शुभेच्छा दिल्या होत्या, तर अमेरिकेने इराण ला पुढील ३ वर्षांसाठी नाम चे अध्यक्ष घोषित करत तेहेरान इथे परिषद बोलावण्याच्या निर्णयावर प्रश्न उभे केलेत. तेहरान परिषदेबाबत अमेरिका आणि रशियाने घेतलेल्या या परस्पर विरोधी भूमिकांमध्ये नाम ची प्रासंगीकता दडलेली आहे.    

शीत युद्ध संपले असले, तरी बड्या राष्ट्राची शीत युद्ध-कालीन मानसिकता कायम आहे. शीत युद्धानंतर अमेरिकेने नॉर्थ एटेलांतीक ट्रीटी ऑरगनायझेशन (नाटो) ला बरखास्त न करता त्या द्वारे युगोस्लाविया, अफगाणिस्तान, लिबिया या देशांमध्ये सशस्त्र हस्तक्षेप घडवून आणले. दुसरीकडे रशियाने पूर्वाश्रमीच्या सोविएत संघातील गणराज्यांशी लष्करी संधी करत नाटो ला समर्थ पर्याय उभे करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. गरीब आणि विकसनशील देशांना आपल्या फायद्यासाठी लष्करी गठबंधनात येण्यास भाग पाडायचे, तसेच आपल्याला पूरक नसणारया राजवटी सशस्त्र हस्तक्षेपाने उलटवून टाकायच्या हे बड्या राष्ट्राचे जुने धोरण अद्याप कायम असल्याने, गट-निरपेक्ष आंदोलनाची गरज आधी सारखी आजही आहे. जगात केवळ एक महासत्ता असो अथवा दोन किंव्हा त्याहून जास्त महासत्ता असो, विकसनशील देशांनी या पैकी कुठल्याही महासत्तेशी लष्करी आणि सामरिक संधी करणे हे त्यांच्या विकासाला मारक आणि स्वातंत्र्यावर घाला आणणारे ठरण्याची जास्त शक्यता आहे. उदाहरणार्थ, भारत जर नाटो चा सदस्य असता तर भारताला अफगाणिस्तान आणि लिबिया या देशांतील सशस्त्र मोहिमांमध्ये सहभागी होणे भाग पडले असते, मग त्यात भारताचे राष्ट्रीय हित समाविष्ट असो किंव्हा नसो! विकसनशील राष्ट्रांनी बड्या राष्ट्रांच्या प्रलोभनाला, तसेच दबावाला, बळी न पडता आपले सामरिक स्वातंत्र्य जपावे या साठी गट-निरपेक्ष आंदोलनाच्या आधाराची आवश्यकता आहे. नजीकच्या भविष्यात जागतिक राजकारणात अमेरिका आणि चीन अशी दोन सत्ता-केंद्रे अस्तित्वात येण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा गट-निरपेक्ष आंदोलनाची धग कायम ठेवत, इतर देश या दोन पैकी एका देशाच्या गटात सहभागी होणार नाही हे सुनिश्चित करणे भारताच्या हिताचे आहे. नाम चा संस्थापक सदस्य असणे आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या, 'महाशक्तींच्या लष्करी गटा-तटाच्या राजकारणापासून नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांना दूर ठेवण्याच्या' धडपडीचे नाम हे फलीत असणे, एवढेच या मंचाचे भारतासाठी महत्व नाही. भारताच्या आजच्या परराष्ट्र धोरणांना नाम तेवढेच पोषक आहे जेवढे २० वर्षांपूर्वी होते!  

साहजिकपणे, भारताचा तेहेरान परिषदेतील सहभाग सर्वोच्च पातळीवर होता. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी परिषदेस हजर राहत गट-निरपेक्ष आंदोलनाप्रतीची भारताची कटीबद्धता व्यक्त केली.  या निमित्त्याने डॉ. मनमोहन सिंग यांनी, सलग तिसऱ्या नाम परिषदेस उपस्थित राहण्याचा दुर्मिळ योगसुद्धा  साधला. सन २००६ च्या हवाना परिषदेत आणि सन २००९ च्या शर्म-एल-शेख परिषदेत डॉ. सिंग जातीने उपस्थित होते. जागतिक राजकारणात नव्याने पुढे आलेल्या 'ब्रिक्स' गटातील देशांपैकी केवळ भारत हा नाम चा मूळ सदस्य आहे. 'ब्रिक्स' गटातील दक्षिण आफ्रिकेने वंशवादी राजवटीच्या समाप्तीनंतर नाम चे सदस्यत्व घेतले आहे, तर ब्राझील आणि रशिया हे देश नाम मध्ये निरीक्षक आहेत आणि नाम बाबत चीन ची भूमिका नेहमीच द्विधा राहिलेली आहे. त्यामुळे, नाम च्या माध्यमातून इतर विकसनशील देशांचे नेतृत्व करण्याची संधी आपसूक भारताला मिळाली आहे. भारताला विद्यमान जागतिक व्यवस्थेत, म्हणजे संयुक्त राष्ट्र, जागतिक बैंक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी यामध्ये, बदल घडवून आणत त्यातील आपले अधिकार आणि जबाबदारी वाढवायची आहे. या संस्थांच्या सुधारणांना बड्या राष्ट्रांकडून फारसे समर्थन प्राप्त नाही, तेव्हा हे बदल घडवून आणण्यासाठी भारताला संयुक्त राष्ट्रातील अन्य देशांच्या समर्थनाची गरज आहे. नाम परिषदेत हे समर्थन प्राप्त करण्याची संधी भारताने गमावली नाही. भारताने आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आजच्या परिस्थितीनुसार बदल घडवून आणत विकसनशील देशांना जास्तीत जास्त वाटा देण्याची मागणी पुढे रेटली. बड्या राष्ट्रांच्या धोरणांनुसार चालणाऱ्या जागतिक बैंक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधी वरील विकसनशील देशांचे परावलंबित्व संपवण्यासाठी,  भारताने विकसनशील देशांच्या नव्या बैंकेची संकल्पना मांडली. भारत सदस्य असलेल्या 'ब्रिक्स' देशांच्या गटाने या संदर्भात या आधीच ठोस सुरुवात केली आहे. त्याला इतर विकसनशील आणि गरीब देशांचे समर्थन मिळवण्याचे महत्वपूर्ण काम भारताने  तेहेरान परिषदेत केले.

तेहेरान परिषदेत केलेल्या भाषणात, डॉ.  मनमोहन सिंग यांनी पाश्चिमात्य देशांच्या एकतर्फी आणि मनमानी लष्करी कारवायांना असलेला भारताचा विरोध स्पष्ट करत अनेक छोट्या आणि विकसनशील देशांचा विश्वास संपादन केला. भारताने आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची चुणूक दाखवत, येत्या काळात सिरीया मध्ये बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपाला विरोध दर्शविला. सिरीया किव्हा इतर अरब देशांमधील राजकीय बदलाची प्रक्रिया त्या-त्या देशांमधील लोकांनी आपणहून सोडवणे आवश्यक आहे, अन्यथा घडून येणारा बदल दिर्घकालीन न राहता यादवी-सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्या देशांच्या अर्थ-व्यवस्थेची राखरांगोळी होईलच, पण अल-कायदा सारख्या जहाल संघटनांना आपले जाळे पसरवण्यास मोकळा वाव मिळून आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल, या परिपक्व विचारांतून भारताने आपली भूमिका स्पष्ट केली. .

तेहेरान परिषदेच्या पार्श्वभूमीवर इराणशी झालेली व्यापक द्वि-पक्षीय चर्चा ही भारतासाठी मोठी उपलब्धी आहे. मागील काही वर्षांपासून भारताचे अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध वाढीस लागल्यानंतर इराणशी असलेल्या सलोख्याला ओहोटी लागली होती. खरे तर, इराण हा भारताचा परंपरागत व्यापारी मित्र आहे आणि आता उशिराने का होईना दोन्ही देशांनी व्यापारी संबंध पुन्हा दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या साठी, इराणने तेल-वाहू जहाजांना पूर्ण इंशुरेंस ची सोय करण्याची जबाबदारी उचलली आहे. शिवाय, तेलाच्या रक्कमेची मोठी टक्केवारी भारतीय रुपयांच्या स्वरूपात स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. याशिवाय, इराणने छबहार बंदर विकसित करण्याच्या भारताच्या  इच्छेला हिरवा कंदील दाखवला आहे. या बंदरामार्गे अफगाणिस्तानातून आयात-निर्यात करण्यासाठी योजना बनवण्यासाठी या तीन देशांची कार्य समिती स्थापन करण्यात आली आहे. भारतासाठी नाम परिषदेच्या निमित्याने घडलेल्या या महत्वपूर्ण घडामोडी आहेत.

भारताला  जागतिक शक्तीच्या रुपात स्वत:ला प्रस्थापित करावयाचे असेल तर दुसऱ्या-तिसऱ्या कोणत्याही जागतिक सत्ता-केंद्राभोवती न घुटमळता स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करणे आवश्यक आहे. नाम ची पायाभरणी झाली होती त्यावेळी भारताचे चांगले हेतू होते, पण त्याला पूरक शक्ती नव्हती. आज भारताची शक्ती कित्येक पट वाढली आहे, आणि नाम च्या माध्यमातून आपल्या हेतूंना आंतरराष्ट्रीय राजकारणात  अंमलात आणण्याचे मार्ग भारताला शोधावयाचे आहेत. याची सुरुवात तेहेरान परिषदेत झाली आहे, पण सातत्य कायम राखणे गरजेचे आहे.     

मंगळाच्या राशीला पृथ्वीचे योग


एके काळी समुद्र उल्लंघन निषिद्ध मानणाऱ्या भारताने स्वातंत्र्यानंतर कात टाकत विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीच्या जोरावर आता मंगळ ग्रहाला गवसणी घालण्याचे ध्येय निश्चित केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजे इस्रोच्या मंगळायानाच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता देत, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वतंत्रता दिनी केलेल्या भाषणात भारताच्या मंगळ मोहिमेचा शंखनाद केला. अमेरिका, रशिया, जापान, चीन आणि युरोप पाठोपाठ मंगळावर संशोधनासाठी मानव-विरहीत यान पाठवणारा भारत सहावा देश ठरणार आहे. चंद्रायनच्या यशस्वी झेपेनंतर इस्रोचे संशोधनयान आता मंगळाच्या घिरट्या घालण्यासाठी नोव्हेंबर २०१३ मध्ये अवकाशात झेपावणार आहे. चंद्राच्या ध्रुवावर पाण्याचे पुरावे शोधण्यात चंद्रयान मोहिमेला ऐतिहासिक यश मिळाले होते. इस्रोचे मंगळायन यापेक्षा अधिक यशस्वी होऊन, माणसाच्या पाऊलखुणा उमटवण्याच्या मोहिमेतील मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा करूया! 

अगदी अलीकडे, अमेरिकी संशोधन संस्था, नासाच्या 'क्युरॉसिटी' रोव्हरने मंगळ ग्रहावर, अत्यंत कठीण परीक्षांचा सामना करत, यशस्वीरीत्या लंगर टाकल्याने भारतासह जगभरातील शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास बळावला आहे. क्युरॉसिटी' ला मंगळावर उतरवण्याचा उपक्रम नासाचा असला, तरी यात भारतासह अनेक देशांच्या वैज्ञानिकांचे भरघोस योगदान आहे. यापैकी, शास्त्रज्ञ अमिताभ घोष हे नासाच्या त्या महत्वपूर्ण चमूत सहभागी होते, ज्याने क्युरॉसिटीची मंगळावरील गेल विवरातील उतरण्याची नेमकी जागा निश्चित केली होती. घोष यांनी सांगितले की, पृथ्वीपासून २४,७८,३८,९७६ किमी दूरीवर असलेल्या या जागेचा भूतकाळ ओलाचिंब असण्याची शक्यता असल्याने त्या जागेची निवड करण्यात आली. निरीक्षणांतून असे आढळले होते की या ठिकाणी माती आणि सल्फेटचे  थर आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर अश्या प्रकारचे थर पाण्यामुळे निर्माण झाले आहेत. मंगळावरील अशा जागेचे परीक्षण केल्यास या ग्रहावर पूर्वी पाणी उपलब्ध होते की नाही याबाबत निश्चित पुरावे मिळू शकतील. गेल विवराच्या मध्यभागी मंगळाचा पृष्ठभाग पर्वतासारखा उंचावला असून, क्युरॉसिटी कालांतराने यावर चढाई करणार आहे. या पर्वताच्या माथ्यावर वेगवेगळे थर वैज्ञानिकांना आढळले असून, प्रत्येक थर हा मंगळावर विविध काळखंडातील वातावरणाची साक्ष देणारा ठरू शकतो.

क्युरॉसिटी प्रत्यक्ष मंगळावरील जीवनाचा शोध घेणार नाही, पण जीवनाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेली रसायने काही मात्रेत तरी उपलब्ध आहेत का याबाबत संशोधन करणार आहे. मंगळ संशोधनाच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे सन १९७६ मध्ये नासाच्या वायकिंग मिशनने या ग्रहावर जीवनाच्या शक्यतेबाबत प्रयोग केले होते. या प्रयोगांमधून मंगळावर सध्या कुठल्याही प्रकारे जीवन अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले नाही असे नासाने अधिकृतरीत्या स्पष्ट केले होते. मात्र, या मोहिमांतील प्रयोगांची रूपरेखा तयार करणाऱ्या चमूचे प्रमुख, गिल्बर्ट लेवीन अजूनही दावा करतात की त्यांना मंगळावर जीवनाचे प्रमाण सापडले होते. सन १९७६ च्या मोहिमांमध्ये २ अवकाशयाने एकाचवेळी मंगळावर उतरली होती आणि त्यांनी बरेच प्रयोग केले होते. यापैकी एका प्रयोगामध्ये पृथ्वीवरून नेलेली प्रोटीनची मात्रा मंगळाच्या मातीत मिसळण्यात आली आणि मातीतील जीवाणू त्याचे प्राशन करून कार्बन डायऑक्षाइड सोडतात का हे तपासण्यात आले. आश्चर्य म्हणजे, शास्त्रज्ञांना कार्बन डायऑक्षाइड सोडण्यात येत असल्याचे ध्यानात आले. ती माती तापवल्यानंतर ही प्रक्रिया बंद पडली. मात्र, वायकिंगच्या इतर कोणत्याही प्रयोगांना इतपत यश मिळू शकले नाही. त्यामुळे, अत्यंत अत्यल्प प्रमाणात सोडण्यात आलेला कार्बन डायऑक्षाइड हा जीवाणूंनी सोडला होता की विशिष्ट प्रकारच्या मातीत प्रोटीन मिसळल्याने झालेली रासायनिक प्रक्रिया होती हे नक्की कळू शकले नाही. मंगळावरील मातीचे संपूर्ण ज्ञान नसल्याने याबाबत तर्क लावणे सुद्धा शक्य नाही. त्यात,  'जीवनाच्या' व्याख्येबद्दल शास्त्रज्ञांमध्ये अजूनही एकमत नाही, आणि जीवनाचे किती विविध प्रकार विश्वात अस्तित्वात असू शकतील याबाबत अनेकानेक मते आहेत. त्यामुळे, यानंतर नासाने मंगळावर प्रत्यक्ष जीवनाचा शोध घेणे थांबवले.

मंगळाला जवळीक करणारे वातावरण पृथ्वीवर ज्या ठिकाणी आहे, तिथे कशा प्रकारचे जीवन अस्तित्वात आहे याचा सुद्धा शास्त्रज्ञांनी शोध लावण्याचा प्रयत्न करत, तसाच काही प्रकार मंगळावर असू शकेल का असा प्रश्न उपस्थित केला. मंगळ अत्याधिक थंड आणि कोरडा ग्रह आहे. यापैकी कोरडेपणा हा जीवनाच्या अस्तित्वातील जास्त मोठा अडथळा आहे, कारण पाण्याशिवाय जीवन अस्तित्वात असू शकत नाही या संकल्पनेस तडा जाईल असे कुठलेही पुरावे अद्याप शास्त्रज्ञांकडे नाहीत. चिली देशातील अटाकामा वाळवंट हे पृथ्वीवरील सर्वात कोरडे स्थान म्हणून ओळखले जाते. गेली कित्येक वर्षे अंतराळ-जैवशास्त्रज्ञ अटाकामाच्या जमिनीत काही जीवाणू तग धरून आहेत का याचा शोध घेत होते. त्यांना यश मिळत नसल्याने मंगळावर जीवाणूंच्या अस्तित्वाची शक्यता सुद्धा जवळपास मावळली होती. पण, सन २००६ मध्ये स्पेनच्या विद्यापीठातील एका रसायनतज्ञांना तिथल्या मिठाच्या खडकासारख्या मातीत जीवाणूंचे अनेक नवे प्रकार आढळलेत आणि याप्रमाणे मंगळावरसुद्धा जीवाणू कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सापडू शकतील या धारणेस बळ मिळाले.

अणुउर्जेवर कार्यान्वित क्युरॉसिटी किमान १ वर्षे ९ महिने मंगळावर अहोरात्र कार्यरत असणार आहे. मंगळावरील जीवनसापेक्षतेचा शोध लावण्याच्या दृष्टीने क्युरॉसिटीचे प्रयोग किती मदतगार सिद्ध होतात हे काही वर्षांनीच कळू शकेल. मात्र, सुमारे ८९० किलो वजनाची ही कारच्या आकाराची प्रयोगशाळा यशस्वीपणे मंगळावर उतरवण्यात यश आल्याने, भविष्यात मानवजातीने या ग्रहावर तंबू ठोकण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल पुढे पडले आहे. सन २०३० पर्यंत मंगळ जिंकण्याच्या नासाच्या महत्वकांक्षेला ओबामा प्रशासनाने नुकताच हिरवा कंदील दिला आहे. मंगळावरील मानवाची स्वारी ही चंद्रावरील यात्रेसारखी अगदी कमी काळाची न राहता तो एक प्रदीर्घ प्रयोग ठरणार आहे. मानवी यानाला मंगळावर पोचायला किमान ६ महिने लागतील आणि तिथले अंतराळवीरांचे वास्तव्य तब्बल १८ महिन्याचे असण्याचे संकेत नासाकडून देण्यात येत आहेत. आजपासून १८ वर्षांनी होऊ घातलेल्या प्रस्तावित मंगळ - यात्रेतील प्रवाश्यांच्या भोजनाबाबत आधीच संशोधन सुरु झाले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रात ठाण मांडून बसणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी नासाच्या मेनूकार्ड वर १०० हुन अधिक पदार्थ आहेत. पण, हा मेनू मंगळावर निरुपयोगी ठरेल कारण ते सर्व पदार्थ पृथ्वीवर तयार करून अंतराळ केंद्रात नियमितपणे पोचवण्यात येतात. ही सुविधा मंगळावरील वैज्ञानिकांना उपलब्ध नसेल. मात्र, आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राप्रमाणे मंगळ पूर्णपणे गुरुत्वाकर्षण-रहित नाही. त्यामुळे, तिथे प्रेशर कुकरच्या वापरासह भाज्या-फळे चिरायचे पर्याय विकसित करण्याच्या प्रयत्नात नासाचे तज्ञ आहेत. सध्या नासाच्या १७ बिलियनच्या आर्थिक तरतुदींपैकी मंगळ ग्रहावर अंतरीक्ष यात्रींच्या खाण्या-पिण्यासंबंधीत मेनू तयार करण्यावर १ मिलियन एवढी रक्कम खर्च होते आहे.  

येत्या दिवसांमध्ये मंगळावर वसाहत निर्माण करण्याच्या दृष्टीने अमेरिका, युरोप, रशिया आणि चीन हे देश प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात शंका नाही. या शर्यतीत जपान सुद्धा उतरला आहे आणि भारताने आपण मागे राहणार नाही याचा सुतोवाच केला आहे. मात्र, मंगळ मोहिमांवर होणारा अवाढव्य खर्च ध्यानात घेता, मंगळावर कूच करण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्पर्धा निर्माण होणे मानव जातीच्या हिताचे नाही. त्या ऐवजी संयुक्त राष्ट्राच्या नियंत्रणाखाली सर्वदेशीय सहकार्याने मंगळावर पोहोचणे सोयीस्कर आणि हितावह आहे. अन्यथा, पृथ्वीवरील विविध देशातील शत्रुत्व मंगळावर पोहोचण्यात वेळ लागणार नाही. यापूर्वी, पृथ्वी भोवतालच्या अंतरिक्षाचा व चंद्राचा उपयोग अण्वस्त्रे तैनात करण्यासाठी करू नये, तसेच फक्त शांततापूर्ण मानवी हिताच्या प्रयोगांसाठी करण्यात यावा यासाठी आंतरराष्ट्रीय दबावातून बड्या राष्ट्रांना करार करावा लागला होता. आता पुन्हा त्याच प्रकारचा करार मंगळाच्या बाबतीत करण्याची वेळ आली आहे. माणसाला पृथ्वीतलावरील कारभारात सामंजस्य दाखवणे अद्याप तेवढेसे जमले नसले, तरी मंगळाबाबतच्या व्यवहारात सर्व देश परिपक्वता दाखवतील अशी आशा करूयात!     

माहिती-तंत्रज्ञानाची असांज-महिमा

प्रसारमाध्यमे आणि जनतेतील असंतोष यांचे नाते खुप जुने आहे. काळ बदलला, वेळ बदलली तरी प्रसार माध्यमांचा उपयोग  व्यवस्थेविरोधात रान पेटवण्यासाठी करण्याची प्रथा कायम  आहे आणि अधिक बळकट होत आहे. वर्तमानपत्रे आणि मासिके प्रचलीत होण्याच्या काळात जगभरातील सुधारणावाद्यांनी पद्धतशीरपणे त्यांचा उपयोग जनजागृतीसाठी केला होता. त्याचप्रमाणे आजच्या इंटरनेटच्या युगात, सगळ्या देशांमध्ये या नव्या प्रसार माध्यमाचा उपयोग प्रस्थापितांविरुद्धच्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी करण्यात येत आहे. मात्र, ज्युलिअन असांज नावाच्या व्यक्तीने जे साध्य करून दाखवले त्याची कल्पनाही भल्याभल्यांनी केली नव्हती. या असांज नावाच्या वादळाने पश्चिमी देशांना पुरते हैराण केले आहे. मात्र, तो स्वत: लैंगिक गैर-व्यवहार आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला असल्याने त्याच्यावर पलटवार करण्याची संधी पाश्चिमात्य देशांना मिळाली आहे.  त्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी असांज ने इक्वेडोर  देशाच्या लंडन दूतावासात शरण घेण्याची शक्कल लढवत, या लढाईतील  पेच अधिक वाढवला आहे.        
ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या असांज ने संगणक प्रणालींचे हैकिंग करण्याच्या तंत्रात विद्वत्ता प्राप्त केली आहे. सन २००६ मध्ये त्याने आपल्या मित्रांच्या आणि धनाढ्य समर्थकांच्या मदतीने विकीलिक्स ही वेबसाईट तयार केली.  लोकशाहीचा मिथ्या अभिमान बाळगणाऱ्या अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये माहितीच्या अधिकारांची होणाऱ्या गळचेपी विरुद्ध आवाज उठवणे  आणि जागतिक स्तरावर या देशांकडून रचली जाणारी कट-कारस्थाने उघड करणे हे विकीलिक्सचे उद्दिष्ट आहे.  असांजच्या 'टीम विकीलिक्स' मध्ये ५ पूर्ण वेळ कार्यकर्ते आणि ८०० ते १००० गरज असेल त्याप्रमाणे पाचारण करता येतील असे कार्यकर्ते आहेत. या टीम विकीलिक्सने, विविध देशातील सरकारे, लष्कर, बहुराष्ट्रीय कंपन्या इत्यादींच्या संगणक प्रणाली मध्ये शिरून  त्यांचे गोपनीय अहवाल आणि पत्राचार हस्तगत केले.  प्रचंड प्रमाणात मिळवलेले महत्वपूर्ण ई-दस्तावेज सुरक्षित साठवून ठेवण्याचे  तंत्र विकीलिक्सने विकसित केले आहे. त्यामुळे, सरकार आणि त्यांचे भाडोत्री ई-तज्ञ यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते दस्तावेज विकीलिक्सच्या ताब्यातून परत मिळवणे किव्हा नष्ट करणे शक्य झालेले नाही.  
विशिष्ट विषयांवरचे सनसनीखेज दस्तावेज जाहीर करण्याची पूर्वसूचना प्रसारमाध्यमांमार्फत  देत, दिलेल्या वेळेत जगात सर्वत्र असे दस्तावेज इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात विकीलिक्सचा हातखंडा आहे.  अमेरिकेचे सरकार आणि त्यांची जगभरातील दुतावासे यांच्यात जवळपास रोज संदेशांची देवाण-घेवाण होत असते. या संदेशांचे सुमारे साडे सात लाख केबल्स विकीलिक्सने हस्तगत करत खळबळ उडवून दिली. आंतरराष्ट्रीय राजकारणातील शिष्टाचारानुसार, सर्वच देशांचे नेते आणि अधिकारी एकमेकांशी बोलतांना संयम राखतात आणि आपले खरे हेतू स्पष्ट करत नाहीत. मात्र, विकीलिक्सने मिळवलेल्या केबल्स मधून शिष्टाचारामागे नेमक्या काय भावना आणि हेतू दडलेले असतात याची स्पष्ट कल्पना येते. उदाहरणार्थ, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत-भेटीवर आले असतांना त्यांनी भारताच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वाच्या दाव्याला समर्थन व्यक्त केले होते. मात्र, याच सुमारास त्यांच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी दूतावासाला पाठवलेल्या एका संदेशात भारताची  'सुरक्षा परिषदेचा स्वयं-घोषित दावेदार' अशी अवहेलना केली होती. या प्रमाणे जगातील प्रत्येक देश, त्या देशांतील राजकीय पक्ष आणि विविध संस्था याबद्दलची अमेरिकेची खरी मते या केबल्स मधून सर्वांना कळल्याने अमेरिकेच्या राजनैतिक प्रतिष्ठेस मोठा धक्का बसला आहे. सन २००९ मध्ये भारतातील सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर मोन्टेक सिंग अहलुवालिया यांना अर्थमंत्री बनवण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केल्याचे या केबल्स द्वारे उघड झाले आहे. त्यांच्या ऐवजी प्रणब मुखर्जी यांना अर्थमंत्रीपद बहाल केल्याबद्दल अमेरिकेने घोर आश्चर्य व्यक्त केले होते, हे सुद्धा या केबल्स मधून दिसून आले आहे. सन २००८ मध्ये मनमोहन सिंग सरकार विरुद्ध अविश्वास प्रस्तावाच्या प्रसंगी मोठ्या प्रमाणात खासदारांची खरेदी करण्यात येत असल्याचे अमर सिंग यांनी अमेरिकेच्या नवी दिल्ली  दुतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले असल्याची केबल दुतावासाने वाशिंग्टनला पाठवली होती, हे सुद्धा विकीलिक्सने उघडकीस आणले आहे. विकीलिक्सने या केबल्स इंटरनेटवर जाहीर केल्यानंतर अमेरिकेची एवढी नालस्ती झाली की हिलरी क्लिंटन यांना सर्व देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना तात्काळ दूरध्वनी करत स्पष्टीकरण देणे भाग पडले होते.   विकीलिक्सच्या हरकती बंद पाडण्यासाठी अमेरिकी आणि मित्र राष्ट्रांच्या सरकारांनी शक्य ते सगळे प्रयत्न केले. विकीलिक्सला मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा ओघ थांबवण्यासाठी व्हिसा, पे-पाल इत्यादी आर्थिक देवाण-घेवाणीच्या  मध्यस्थ संस्थांवर दबाव आणत त्यांचे विकीलिक्सशी असलेले सगळे व्यवहार बंद पाडण्यात आले. या गळचेपीला उत्तर देण्यासाठी असांज समर्थकांनी  'एनोनिमस' नावाने या संस्थांच्या वेब साईटवर हल्ला चढवत त्या हैक केल्या आणि त्यांचे सर्व व्यवहार काही काळासाठी  बंद पाडण्यात यश मिळवले होते. अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र विकीलिक्स-विरोधात साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करत आहेत, हे स्पष्ट आहे. या नीतीनुसार सर्व मार्ग अपयशी ठरल्यानंतर असांज विरुद्ध २ युवतींकडून बलात्कार आणि लैंगिक गैर-व्यवहाराची तक्रार स्वीडेन मध्ये दाखल करण्यात आली असे विकीलिक्सचे म्हणणे आहे. विकीलिक्सने उजेडात आणलेल्या संदेश-केबल्स आणि युद्ध दस्तावेज विकीलिक्सला मिळवून देण्याच्या आरोपाखाली ब्रेडली मैनिंग या अमेरिकी सैनिकाला इराक मध्ये अटक करण्यात आली. ब्रेडलीचा आता नाना प्रकारे छळ करण्यात येत असल्याच्या अनेक बातम्या प्रचलीत आहेत. याच प्रकारचा गुप्त छळ असांजच्या वाटेला येऊ शकतो असे विकीलिक्स आणि त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे, लैंगिक-गैर व्यवहार प्रकरणात न्यायालयीन लढाईस सामोरे न जाता भूमिगत राहण्याच्या किव्हा इक्वेडोर दुतावासात शरण मागण्याच्या असांज-कृत्याचे ते समर्थन करत आहेत.   प्रगत आणि सामर्थ्यवान देशांतील सरकारी व्यवस्थांचा तीव्र रोष ओढून घेणाऱ्या असांज ला इक्वेडोर सारख्या दक्षिणी अमेरिकेतील चिमुकल्या गरीब देशाने तरी का शरण द्यावी, याचे गुपित विकीलिक्सने उघड केलेल्या केबल्स मध्ये दडलेले आहे.  सन २०१० मध्ये, अमेरिकेच्या इक्वेडोर मधील त्यावेळच्या राजदूत हिथर होग्स यांनी वाशिंग्टनला पाठवलेल्या एका केबल मध्ये इक्वेडोरचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष राफेल कोरिया यांची भर्त्सना केली होती. कोरिया यांनी मुक्तहस्ताने भ्रष्टाचार करता यावा यासाठी अयोग्य व्यक्तीची पोलीस-प्रमुख पदावर नियुक्ती केल्याचे केबल द्वारे अमेरिकेला कळवण्यात आले होते. विकीलिक्सने ही केबल उघड केल्यानंतर कोरिया यांचा अमेरिका-द्वेष उफाळून आला होता. आता असांज ला शरण देण्याचा निर्णय घेत कोरिया यांनी अमेरिकेने त्यांच्याविरुद्ध चालवलेल्या दुष्प्रचाराला जोरदार उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, मागील दशकामध्ये दक्षिण अमेरिकेत अमेरिका विरोधी डाव्या सरकारांची लहर आली आहे. कोरिया यांचे सरकार सुद्धा डाव्या विचारसरणीचे आहे, मात्र इक्वेडोर बाहेर त्यांची फारशी लोकप्रियता नाही.  आता कोरिया यांनी, वेनेझुएलाचे हुगो चावेझ आणि क्युबाचे फिडेल कैस्त्रो यांच्याप्रमाणे संपूर्ण दक्षिणी अमेरिकी जनतेमध्ये मानाचे स्थान मिळवण्याचा प्रयत्न  असांज प्रकरणाच्या माध्यमातून केल्याचे विश्लेषकांचे मत आहे.   असांज इक्वेडोरच्या लंडन दुतावासात असल्याने आता ब्रिटेन, स्वीडेन आणि इक्वेडोर यांच्या दरम्यान पेच-प्रसंग निर्माण झाला आहे. सन १९६१ च्या विएन्ना करारानुसार, यजमान देश इतर देशांच्या दुतावासात कोणत्याही कारणाने परवानगी शिवाय प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे, इक्वेडोर दुतावासात पोलीस पाठवून असांज ला ताब्यात घेण्यात येईल असे संकेत ब्रिटेनने देताच जगभरात सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. अश्या कृत्याने  अत्यंत चुकीचा पायंडा पडू शकतो याची जाणीव अखेर ब्रिटेन ला झालेली दिसते आणि अशी घुसखोरी करण्यात येणार नाही असे आश्वासन ब्रिटेनने इक्वेडोरला देऊ केले आहे. मात्र, दूतावासातून बाहेर पडता क्षणी असांजला ताब्यात घेण्याचा ब्रिटेनला अधिकार आहे. त्यामुळे, ४१-वर्षीय असांज च्या उर्वरीत भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापुढचे सगळे आयुष्य लंडनच्या इक्वेडोर दुतावासात नजरकैदेत असलेल्या अवस्थेत काढायचे हा सरळ पण मानसिकदृष्ट्या तेवढाच कठीण पर्याय असांजकडे आहे. याशिवाय, इक्वेडोर असांज ला नागरिकत्व बहाल करत त्याची नेमणूक देशाचा संयुक्त राष्ट्रातील विशेष अधिकारी म्हणून करू शकते. हा दर्जा असांज ला मिळाल्यास, ब्रिटेन सरकार त्याला अटक करू शकणार नाही. मात्र, सध्या हा पर्याय इक्वेडोर किव्हा असांज च्या विचाराधीन नाही. इक्वेडोर ने असांजच्या वतीने प्रस्ताव ठेवला आहे की, ब्रिटेन आणि स्वीडेन यांनी असांज ला अमेरिकेच्या हवाली करण्यात येणार नाही असे लेखी आश्वासन द्यावे. मात्र, या साठी हे दोन्ही देश तयार नाहीत. त्यामुळे, आणखी बराच काळ हा तिढा कायम राहण्याची चिन्हे आहेत.  
असांज ने अमेरिका आणि इतर बलाढ्य राष्ट्रांचा दुटप्पीपणा सातत्याने उजेडात आणला आहे. त्याच्या प्रभावामुळे अमेरिका आणि संपूर्ण युरोपमध्ये 'ऑक्यूपाय' आंदोलनाने जोर पकडला होता, ज्यामध्ये माहिती-तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करत हजारो तरुण-तरुणींनी विविध देशातील सरकारांच्या तोंडचे पाणी पळवले होते. मात्र, असांज वर झालेल्या गंभीर आरोपाची दखल पाश्चिमात्य देशातील नागरी समाजाने घेतली आहे. या आरोपांनंतर विकीलिक्स चे समर्थन काही प्रमाणात कमी झाले आहे. तेव्हा, या आरोपांची शहानिशा होत कायदेशीर मार्गाने न्याय होण्यासाठी असांज ने स्वीडेन पुढे समर्पण करणे हे त्याच्यासाठी आणि त्याच्या प्रेरणेने पेटून उठलेल्या आंदोलनासाठी योग्य ठरणार आहे. मात्र, ब्रिटेन आणि स्वीडेन यांनी त्याला अमेरिकेच्या सुपूर्द करण्यात येणार नाही अशी ग्वाही देण्यास नकार दिल्याने या  राष्ट्रांच्या खऱ्या हेतुंबाबत असांज, विकीलीक्स आणि इक्वेडोर ने उपस्थित केलेल्या शंका निराधार नाहीत हे स्पष्ट होते. या परिस्थितीत असांज च्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असली तरी,  माहिती-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रस्थपितांविरुद्ध लढण्याच्या त्याने दाखवलेल्या मार्गावर यापुढे जगभरातील आंदोलनकारी चालत राहणार हे निश्चित!      

सावरकरांबद्दल आणखी काही......


सावरकरांच्या जीवनाच्या विविध छटा आहेत. बहुरंगी-बहुढंगी; काळ्या आणि पांढऱ्या आणि तांबड्या. अंदमानात रवानगी होण्याआधीचे सावरकर हे देशभक्तीने ओतप्रोत भरलेले आणि येन-केन-प्रकारेन ब्रिटिशांना भारतातून हिसकावून लावण्यासाठी प्राणाची आहुती देण्यासाठी सदैव सज्ज असलेले प्रभावी तरुण व्यक्तीमत्व होते. तोपर्यंत विचारधारेचे रंग त्यांच्यावर चढले नव्हते. त्यांच्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' मध्ये याची अनुभूती येते. अंदमानात हाल-अपेष्टा सोसतांना त्यांच्यामध्ये आमुलाग्र परिवर्तन झाले. गोऱ्या-परक्यांविरुद्धची लढाई ही 'क्षण-भंगूरता' असल्याचे त्यांना जाणवले; आणि 'आपल्याच घरात आपलेच होऊन बसलेल्या आणि तरीही आपले नसलेल्या यमनांविरुद्धचा यल्गार' हे शाश्वत सत्य असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. त्यातून जन्म घेतला हिंदुत्वाच्या विचारधारेने; जी आजच्या तालिबान सारखी पुराणमतवादी नव्हती; तर अस्सल वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुरस्कार करणारी भविष्यवादी विचारसरणी होती. जातीभेद तोडणारी; अंधःश्रद्धांवर प्रहार करणारी जीवनप्रणाली होती. सावरकरांनी आयुष्यभर या हिंदुत्वाचा पुरस्कार केला. गायीला माता मानू नका; गायीकडे एक बहु-उपयोगी प्राणी म्हणून बघा; समुद्र-उल्लंघन केल्याने नाश होणार नाही तर त्यानेच प्रगती साधेल अशा शिकवणी त्यांनी दिल्या आहेत. भाषा-समृद्धीचा कोरडा आग्रह न धरता बदलत्या काळातील नव-नव्या घटना ध्यानात घेत मराठी-शब्द निर्मितीचा ध्यास सावरकरांनी घेतला होता. त्यातून माय-मराठी केवढी तरी संपन्न झाली आहे. 

सावरकरांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाची 'श्वेत-पत्रिका' बरीच मोठी आहे. मात्र त्यावर पर-धर्म द्वेषाचे गडद काळे ढग सुद्धा जमलेले आहेत. सावरकरांच्या स्वप्नातील भारतात मुस्लीम आणि इसाई धर्माला आणि या धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना कुठेही स्थान नाही. भारताच्या संमिश्र संस्कृतीबद्दल कुठेही अभिमान नाही की 'एकीच्या बळाची' प्रचिती नाही. सावरकरांच्या विचारांमध्ये धर्म-युद्धाच्या नावाखाली कधीही न संपणाऱ्या गृह-युद्धाची बीजे सर्वत्र पेरलेली आहेत. 'त्यांच्या' पासून सुटका करून घेण्यासाठी 'त्यांच्या' स्त्रियांवर बलात्कार करण्यापासून ते 'त्या सर्वांना' हुसकावून लावण्यापर्यंतचे सर्व उपाय त्यांना मान्य होते. हिंदू आणि मुस्लीम ही दोन राष्ट्रे आहेत आणि ती एकत्र नांदूच शकत नाहीत या निष्कर्षाप्रत पोहोचणारे सावरकर हे पहिले भारतीय नेते होते. द्वि-राष्ट्रवादाचा मूळ सिद्धांत सावरकरांचा; जो सन १९४० मध्ये जिन्नांनी पाकिस्तानच्या मागणीच्या समर्थनार्थ पुढे केला आणि अखेर नेहरू-पटेल यांनी फाळणीला मान्यता देऊन अप्रत्यक्षपणे स्वीकारला. जिन्नांच्या मुस्लीम लीगने ओकलेल्या विषारी प्रचाराला सावरकर-हेगडेवार यांनी उभारलेल्या हिंदुत्वाच्या 'गुढीमुळे' बळच मिळाले. बहुसंख्यकांचा जातीयवाद आणि अल्पसंख्यकांचा जातीयवाद एकमेकांना पूरक ठरलेत आणि अजूनही ठरत आहेत. पाकिस्तान वेगळा झाल्यावर देशातल्या सगळ्या मुस्लिमांनी चालते व्हावे अशी मनोमन इच्छा सावरकरांची असणारच. तसे होणे शक्य नसेल तर 'दुय्यम' नागरिक म्हणून त्यांनी भारतात रहावे असे सावरकरांचे स्पष्ट मत होते. मात्र; भारतीय राज्यघटनेने दिलेली 'एक व्यक्ती एक मत' आणि 'सर्व व्यक्ती समान अधिकार' ही तत्वे सावरकरांना मान्य नव्हती.

आपल्या स्वप्नातील हिंदू-राष्ट्र साकारण्यासाठी सर्व ते प्रयत्न आणि सगळ्या तडजोडी करण्याची सावरकरांची तयारी होती. पण अंदमानच्या चार भिंतींच्या आत जन्मठेप भोगतांना हे कसे शक्य होते? वैज्ञानिक विचारसरणीमुळे त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास नसावा आणि त्यामुळे मिळाल्या जन्मीच कार्य सिद्धीस नेण्याची त्यांची तत्परता होती. तेव्हा ब्रिटीशांशी तडजोड करून 'मायभूमी' परतण्याची किमया त्यांनी  साधली. त्यांच्यासोबतच्या अंदमानातील अनेक क्रांतीकारकांपुढे सुद्धा हा पर्याय होता पण सावरकर वगळता अन्य कोणीही त्याला शरण गेले नाही. पण; अंदमानातील जन्मठेप पूर्ण  भोगलेल्या किव्हा तिथेच प्राण सोडलेल्या कोणत्या क्रांतिकारकाचे नाव जन-सामान्यास ठाऊक आहे? अंदमानात असतांना सावरकर आणि ब्रिटीश राज्यकर्त्यांमध्ये प्रदीर्घ पत्र-व्यवहार झाला; ज्याबद्दल १९७० च्या दशकाच्या मध्यापर्यंत  कुणासही ठाऊक नव्हते. एका संशोधकाला संशोधन कार्यादरम्यान या पत्रांचा छडा लागल्यावर सावरकरांच्या जन्मठेपेची शिक्षा अर्धवट भोगून सुटका होण्याच्या घटनेमागील तथ्ये पुढे आलीत. अंदमानहून सुटका होण्याच्या मोबदल्यात ब्रिटीशांचे प्रभुत्व मान्य करण्याचे आश्वासन सावरकरांनी ब्रिटीश राज्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्राद्वारे दिले. राजकारणात भाग न घेण्याची आणि काही वर्षांसाठी रत्नागिरी जिल्हा न सोडण्याची अट सुद्धा सावरकरांनी मान्य केली. सन १९३९-४० पर्यंत त्यांनी 'करारानुसार' कोणतेही पद स्वीकारले नाही. ते अंदमानातून परत आल्यावर त्यांनी ब्रिटीशांविरुद्ध एक तरी चळवळ उभारण्याचा दाखला आपणास ठाऊक आहे का? द्वितीय विश्वयुद्ध सुरु झाल्यानंतर गांधींसह कॉंग्रेसचे नेते ब्रिटीश सैन्याशी सहयोग न करण्याचे आवाहन करत होते आणि सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र सैन्याची आघाडीच उघडली होती; त्या काळात सावरकर हिंदू तरुणांना 'ब्रिटीश सैन्यात' शामिल होऊन हिंदू-राष्ट्राच्या निर्मितीसाठी सुसज्ज होण्याचे आवाहन करत होते.

स्वातंत्र्य लढ्याच्या काळात कॉंग्रेस ने ब्रिटीशांशी बरेचदा तडजोडी केल्यात; वाटाघाटी आणि करार केलेत. मात्र; जे झाले ते सगळ्यांपुढे झाले. ब्रिटीश आणि सावरकर यांच्या दरम्यान झालेल्या पत्र-व्यवहाराबद्दल सावरकरांनी स्वत: कधीही माहिती दिली नाही; ती लपवूनच ठेवली. त्यांची पत्रे प्रसिद्धीस आल्यानंतर ती 'सावरकरांची गनिमी चाल होती' असे हिंदुत्ववादी सांगतात. मात्र; 'गनिमी कावा' नेमका कशासाठी होता? कारण अंदमानातून सुटका झाल्यानंतर सावरकर कधीही ब्रिटीशांविरुद्ध लढले नाहीत. अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा भोगणे हे अत्यंत कष्टप्रद काम होते आणि जर कुणास  ते शक्य झाले नाही तर तो मानवी स्वभावातील मृदुपणा म्हणून नक्कीच क्षम्य आहे. पण मग अशांचे पोवाडे आपण गावेत का?