Showing posts with label India's foreign policy; non-alignment; Panchsheel; anti-nuclear; national interest. Show all posts
Showing posts with label India's foreign policy; non-alignment; Panchsheel; anti-nuclear; national interest. Show all posts

Thursday, September 6, 2012

नाम' मध्ये काय ठेवलय?


गट-निरपेक्षता हवी आहे का; ती फायद्याची आहे  का; खरी गट-निरपेक्षता शक्य आहे का इत्यादी नेहमीच्या प्रश्नांच्या घोळात नाम ची १६ वी त्री-वार्षिक परिषद तेहरान इथे पार पडली. सन १९६१ मध्ये बेलग्रेड इथे गट-निरपेक्षता आंदोलनाची अधिकृत मुहूर्तमेढ रोवतांना सुद्धा हेच प्रश्न विचारण्यात आले होते आणि तेव्हा पासून आतापर्यंत या प्रश्नांचे पूर्ण समाधानकारक उत्तर मिळाले नसले तरी नाम ची सदस्यता सातत्याने वाढतच आहे. ज्या शीत युद्धाच्या प्रकोपासून दूर राहण्यासाठी नाम ची सुरुवात झाली होती, ते शीत युद्ध इतिहास जमा झाले असले तरी नाम अद्याप कायम आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस इराणची राजधानी तेहेरान इथे भरलेल्या १६ व्या नाम परिषदेस ३१ राष्ट्र-प्रमुख, इतर ८९ सदस्य देशांचे वरिष्ठ प्रतिनिधी, २० पेक्षा जास्त देशांचे निरीक्षक आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव हजर होते. रशियाने परिषदेस शुभेच्छा दिल्या होत्या, तर अमेरिकेने इराण ला पुढील ३ वर्षांसाठी नाम चे अध्यक्ष घोषित करत तेहेरान इथे परिषद बोलावण्याच्या निर्णयावर प्रश्न उभे केलेत. तेहरान परिषदेबाबत अमेरिका आणि रशियाने घेतलेल्या या परस्पर विरोधी भूमिकांमध्ये नाम ची प्रासंगीकता दडलेली आहे.    

शीत युद्ध संपले असले, तरी बड्या राष्ट्राची शीत युद्ध-कालीन मानसिकता कायम आहे. शीत युद्धानंतर अमेरिकेने नॉर्थ एटेलांतीक ट्रीटी ऑरगनायझेशन (नाटो) ला बरखास्त न करता त्या द्वारे युगोस्लाविया, अफगाणिस्तान, लिबिया या देशांमध्ये सशस्त्र हस्तक्षेप घडवून आणले. दुसरीकडे रशियाने पूर्वाश्रमीच्या सोविएत संघातील गणराज्यांशी लष्करी संधी करत नाटो ला समर्थ पर्याय उभे करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. गरीब आणि विकसनशील देशांना आपल्या फायद्यासाठी लष्करी गठबंधनात येण्यास भाग पाडायचे, तसेच आपल्याला पूरक नसणारया राजवटी सशस्त्र हस्तक्षेपाने उलटवून टाकायच्या हे बड्या राष्ट्राचे जुने धोरण अद्याप कायम असल्याने, गट-निरपेक्ष आंदोलनाची गरज आधी सारखी आजही आहे. जगात केवळ एक महासत्ता असो अथवा दोन किंव्हा त्याहून जास्त महासत्ता असो, विकसनशील देशांनी या पैकी कुठल्याही महासत्तेशी लष्करी आणि सामरिक संधी करणे हे त्यांच्या विकासाला मारक आणि स्वातंत्र्यावर घाला आणणारे ठरण्याची जास्त शक्यता आहे. उदाहरणार्थ, भारत जर नाटो चा सदस्य असता तर भारताला अफगाणिस्तान आणि लिबिया या देशांतील सशस्त्र मोहिमांमध्ये सहभागी होणे भाग पडले असते, मग त्यात भारताचे राष्ट्रीय हित समाविष्ट असो किंव्हा नसो! विकसनशील राष्ट्रांनी बड्या राष्ट्रांच्या प्रलोभनाला, तसेच दबावाला, बळी न पडता आपले सामरिक स्वातंत्र्य जपावे या साठी गट-निरपेक्ष आंदोलनाच्या आधाराची आवश्यकता आहे. नजीकच्या भविष्यात जागतिक राजकारणात अमेरिका आणि चीन अशी दोन सत्ता-केंद्रे अस्तित्वात येण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा गट-निरपेक्ष आंदोलनाची धग कायम ठेवत, इतर देश या दोन पैकी एका देशाच्या गटात सहभागी होणार नाही हे सुनिश्चित करणे भारताच्या हिताचे आहे. नाम चा संस्थापक सदस्य असणे आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या, 'महाशक्तींच्या लष्करी गटा-तटाच्या राजकारणापासून नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांना दूर ठेवण्याच्या' धडपडीचे नाम हे फलीत असणे, एवढेच या मंचाचे भारतासाठी महत्व नाही. भारताच्या आजच्या परराष्ट्र धोरणांना नाम तेवढेच पोषक आहे जेवढे २० वर्षांपूर्वी होते!  

साहजिकपणे, भारताचा तेहेरान परिषदेतील सहभाग सर्वोच्च पातळीवर होता. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी परिषदेस हजर राहत गट-निरपेक्ष आंदोलनाप्रतीची भारताची कटीबद्धता व्यक्त केली.  या निमित्त्याने डॉ. मनमोहन सिंग यांनी, सलग तिसऱ्या नाम परिषदेस उपस्थित राहण्याचा दुर्मिळ योगसुद्धा  साधला. सन २००६ च्या हवाना परिषदेत आणि सन २००९ च्या शर्म-एल-शेख परिषदेत डॉ. सिंग जातीने उपस्थित होते. जागतिक राजकारणात नव्याने पुढे आलेल्या 'ब्रिक्स' गटातील देशांपैकी केवळ भारत हा नाम चा मूळ सदस्य आहे. 'ब्रिक्स' गटातील दक्षिण आफ्रिकेने वंशवादी राजवटीच्या समाप्तीनंतर नाम चे सदस्यत्व घेतले आहे, तर ब्राझील आणि रशिया हे देश नाम मध्ये निरीक्षक आहेत आणि नाम बाबत चीन ची भूमिका नेहमीच द्विधा राहिलेली आहे. त्यामुळे, नाम च्या माध्यमातून इतर विकसनशील देशांचे नेतृत्व करण्याची संधी आपसूक भारताला मिळाली आहे. भारताला विद्यमान जागतिक व्यवस्थेत, म्हणजे संयुक्त राष्ट्र, जागतिक बैंक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी यामध्ये, बदल घडवून आणत त्यातील आपले अधिकार आणि जबाबदारी वाढवायची आहे. या संस्थांच्या सुधारणांना बड्या राष्ट्रांकडून फारसे समर्थन प्राप्त नाही, तेव्हा हे बदल घडवून आणण्यासाठी भारताला संयुक्त राष्ट्रातील अन्य देशांच्या समर्थनाची गरज आहे. नाम परिषदेत हे समर्थन प्राप्त करण्याची संधी भारताने गमावली नाही. भारताने आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आजच्या परिस्थितीनुसार बदल घडवून आणत विकसनशील देशांना जास्तीत जास्त वाटा देण्याची मागणी पुढे रेटली. बड्या राष्ट्रांच्या धोरणांनुसार चालणाऱ्या जागतिक बैंक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधी वरील विकसनशील देशांचे परावलंबित्व संपवण्यासाठी,  भारताने विकसनशील देशांच्या नव्या बैंकेची संकल्पना मांडली. भारत सदस्य असलेल्या 'ब्रिक्स' देशांच्या गटाने या संदर्भात या आधीच ठोस सुरुवात केली आहे. त्याला इतर विकसनशील आणि गरीब देशांचे समर्थन मिळवण्याचे महत्वपूर्ण काम भारताने  तेहेरान परिषदेत केले.

तेहेरान परिषदेत केलेल्या भाषणात, डॉ.  मनमोहन सिंग यांनी पाश्चिमात्य देशांच्या एकतर्फी आणि मनमानी लष्करी कारवायांना असलेला भारताचा विरोध स्पष्ट करत अनेक छोट्या आणि विकसनशील देशांचा विश्वास संपादन केला. भारताने आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची चुणूक दाखवत, येत्या काळात सिरीया मध्ये बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपाला विरोध दर्शविला. सिरीया किव्हा इतर अरब देशांमधील राजकीय बदलाची प्रक्रिया त्या-त्या देशांमधील लोकांनी आपणहून सोडवणे आवश्यक आहे, अन्यथा घडून येणारा बदल दिर्घकालीन न राहता यादवी-सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्या देशांच्या अर्थ-व्यवस्थेची राखरांगोळी होईलच, पण अल-कायदा सारख्या जहाल संघटनांना आपले जाळे पसरवण्यास मोकळा वाव मिळून आंतरराष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल, या परिपक्व विचारांतून भारताने आपली भूमिका स्पष्ट केली. .

तेहेरान परिषदेच्या पार्श्वभूमीवर इराणशी झालेली व्यापक द्वि-पक्षीय चर्चा ही भारतासाठी मोठी उपलब्धी आहे. मागील काही वर्षांपासून भारताचे अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध वाढीस लागल्यानंतर इराणशी असलेल्या सलोख्याला ओहोटी लागली होती. खरे तर, इराण हा भारताचा परंपरागत व्यापारी मित्र आहे आणि आता उशिराने का होईना दोन्ही देशांनी व्यापारी संबंध पुन्हा दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या साठी, इराणने तेल-वाहू जहाजांना पूर्ण इंशुरेंस ची सोय करण्याची जबाबदारी उचलली आहे. शिवाय, तेलाच्या रक्कमेची मोठी टक्केवारी भारतीय रुपयांच्या स्वरूपात स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. याशिवाय, इराणने छबहार बंदर विकसित करण्याच्या भारताच्या  इच्छेला हिरवा कंदील दाखवला आहे. या बंदरामार्गे अफगाणिस्तानातून आयात-निर्यात करण्यासाठी योजना बनवण्यासाठी या तीन देशांची कार्य समिती स्थापन करण्यात आली आहे. भारतासाठी नाम परिषदेच्या निमित्याने घडलेल्या या महत्वपूर्ण घडामोडी आहेत.

भारताला  जागतिक शक्तीच्या रुपात स्वत:ला प्रस्थापित करावयाचे असेल तर दुसऱ्या-तिसऱ्या कोणत्याही जागतिक सत्ता-केंद्राभोवती न घुटमळता स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करणे आवश्यक आहे. नाम ची पायाभरणी झाली होती त्यावेळी भारताचे चांगले हेतू होते, पण त्याला पूरक शक्ती नव्हती. आज भारताची शक्ती कित्येक पट वाढली आहे, आणि नाम च्या माध्यमातून आपल्या हेतूंना आंतरराष्ट्रीय राजकारणात  अंमलात आणण्याचे मार्ग भारताला शोधावयाचे आहेत. याची सुरुवात तेहेरान परिषदेत झाली आहे, पण सातत्य कायम राखणे गरजेचे आहे.     

Saturday, June 30, 2012

परराष्ट्र धोरणाचा परिपाठ


एखाद्या राष्ट्राच्या सार्वभौमित्वासाठी त्या राष्ट्राचे स्वतंत्र राजकीय धोरण, स्वतंत्र आर्थिक धोरण आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण असणे गरजेचे असते. राज्यकर्त्यांच्या राजकीय दृष्टिकोनानुसार आर्थिक धोरणाची घडी बसवण्यात येते, तर राजकीय दृष्टीकोन आणि आर्थिक निकड यांची सांगड घालत परराष्ट्र धोरणाची गुढी उभारण्यात येते. म्हणजे, राष्ट्राच्या राजकीय उद्दिष्टांचे रक्षण करण्याची आणि आर्थिक आवश्यकतांची पूर्ती करायची जबाबदारी परराष्ट्र धोरणांच्या माध्यमातून पार पाडली जाते. राजकीय उद्दिष्ट आणि आर्थिक गरज यांची बेरीज केल्यास 'राष्ट्रीय हित' सामोरे येते. याचाच अर्थ, देशाचे सार्वभौमित्व अबाधित राखत, राष्ट्रीय हितांचे रक्षण आणि पूर्तता करण्यात हातभार लावणे, हे परराष्ट्र धोरणाचे प्राथमिक कर्तव्य आहे.
देशाला सार्वभौमित्व प्राप्त करून देण्याच्या प्रक्रियेतील अनुभव आणि ऐतिहासिक घडामोडींचा देशाच्या परराष्ट्र धोरणावर प्रदीर्घ ठसा उमटतो. सार्वभौमित्वासाठीच्या आंदोलनकाळातील मित्रांशी, सहनुभूतीदारांशी, सह-प्रवाशांशी आणि अनुभवांशी जुळलेली नाळ तोडणे शक्य नसते. त्यामुळे, सार्वभौमित्वासाठी, म्हणजे स्वातंत्र्यासाठी, कोणत्या शक्तींविरुद्ध आणि विचारधारेविरुद्ध लढा देण्यात आला, त्या काळातील आंतरराष्ट्रीय समर्थक आणि मित्र कोण होते, आपल्याप्रमाणे लढणारे इतर समुदाय कोणते होते आणि आहेत या बाबींचा परराष्ट्र धोरणावर दीर्घकाळ प्रभाव असतो.        
 
परराष्ट्र धोरणात बरेचदा राष्ट्रीय हिताला आदर्शवादाविरुद्ध उभे करण्यात येते, आणि आदर्शवादाला प्राधान्य न देता, राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राथमिकता देण्यात यावी असा आग्रह करण्यात येतो. मात्र, धोरण बनवणाऱ्यांच्या दृष्टीने असा फरक करणे फार सोपे नसते. कारण, राज्यकर्त्यांच्या आदर्शवादाच्या संकल्पनेनुसार 'राष्ट्रीय हित' ठरवण्यात येत असते. आदर्श राष्ट्राची संकल्पना मूर्त रुपात आणण्यासाठी ज्या उद्दिस्थांची प्राप्ती करणे आवश्यक आहे त्यांना 'राष्ट्रीय हित' म्हणून संबोधण्यात येते. म्हणजेच, राज्यकर्त्यांच्या विचारधारेनुसार राष्ट्रीय हिताची परिभाषा बदलू सुद्धा शकते. याचा अर्थ, परराष्ट्र धोरणावर राज्यकर्त्यांच्या विचारधारेचा सर्वाधिक परिणाम होतो. राज्यकर्त्यांच्या विचारधारेला देशातील बहुसंख्य लोकांची मान्यता आहे असे गृहीत धरले जाते, ज्याशिवाय  राज्यकर्त्यांना त्यांचे स्थान अबाधित राखणे शक्य होणार नाही. पर्यायाने, विशेषत: भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात, राज्यकर्त्यांच्या परराष्ट्र धोरणाला जनतेचा पाठींबा असल्याचे गृहीत धरण्यात येते. याशिवाय, काही राष्ट्रीय हित, जसे की देशाचे अखंडत्व कायम राखणे आणि आर्थिक प्रगती साधने, यांचा सगळ्याच विचारधारांमध्ये प्राधान्याने विचार करण्यात येतो. अशी राष्ट्रीय हिते राष्ट्राच्या संकल्पनेशी जोडलेली आहेत ज्यांची दखल प्रत्येक देशाच्या परराष्ट्र धोरणात घेण्यात येते.  
राज्यकर्त्यांच्या वैचारिक आदर्शवादाला वेसण बसते ती दोन घटकांमुळे; राष्ट्राची विद्यमान शक्ती हा अंतर्गत घटक, आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची तत्कालिक रचना हा बाह्य घटक. परराष्ट्र धोरणाची आखणी करतांना देशाच्या सर्वांगीण  शक्तीचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. यामध्ये, संरक्षण सक्षमता, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक एकजुटता या बाबींचा प्रामुख्याने समावेश होतो. कोणत्याही राष्ट्राच्या या बाबी जेवढ्या बळकट, तेवढी त्या देशाची परराष्ट्र धोरणातील स्वतंत्रता जास्त असे अलिखित सूत्र आहे. याच्या बरोबरीने, परराष्ट्र धोरण ठरवतांना त्या काळातील आंतरराष्ट्रीय राजकारणाची मांडणी ध्यानात घेणे गरजेचे असते. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप एकध्रुवीय आहे की द्वि-ध्रुवीय की बहु-ध्रुवीय यानुसार परराष्ट्र धोरणाची दिशा ठरत असते. त्याचबरोबर, क्षेत्रीय किव्हा देशाच्या अगदी शेजारच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप, तसेच शेजारील राष्ट्रातील राज्यकर्त्यांची विचारधारा काय आहे, याचा विचार परराष्ट्र धोरण ठरवण्यात प्राधान्याने करण्यात येतो.
यानुसार राष्ट्रीय हित, ऐतिहासिक घडामोडी, राज्यकर्त्यांची विचारधारा, राष्ट्र शक्ती आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची रचना हे पाच घटक देशाचे परराष्ट्र धोरण निश्चित करण्यात सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाची विभागणी २ भागांमध्ये करता येईल. एक, सन १९४७ ते सन १९९१, आणि दोन, सन १९९१ पासून पुढे. सन १९९१ मध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाची रचना बदलली. सोविएत संघ कोलमडल्यामुळे द्वि-ध्रुवीय विश्वाची जागा एक-ध्रुवीय विश्वाने घेतली आणि अमेरिका जगातील एकमात्र महाशक्ती रुपात उरला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक घडामोडींचे संदर्भ पुढील ४ दशकांमध्ये आमुलाग्र बदलले होते. विशेषत: आशिया आणि आफ्रिकेतील देशांना स्वातंत्र्यप्राप्त झाल्यानंतर आणि दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवट संपुष्टात आल्याने 'वसाहतवाद विरोधी' धोरणाची, आणि अनुषंगाने पाश्चिमात्य देशांच्या साम्राज्यवादी धोरणांना विरोधाची, समर्पकता फक्त पैलेस्तीन मुद्द्यापुरती उरली. स्वातंत्र्यानंतरच्या औद्योगीक आणि कृषी विकासामुळे, तसेच संरक्षण क्षमतेत वाढ झाल्यामुळे राष्ट्राची शक्ती निश्चितच वाढली होती. सन १९४७ च्या तुलनेत सन १९९१ मधील भारत, त्यातील सर्व मतभेद आणि विषमतेसह, जास्त बलवान होता. सन १९९१ मध्ये राज्यकर्त्यांच्या विचारधारेत मोठा बदल घडून आला होता. समाजवादी उद्दिष्टांच्या प्रभावाखालील संमिश्र अर्थव्यवस्थेला तिलांजली देऊन भांडवली मुक्त-अर्थव्यवस्था निर्माण करण्याला वाव देण्याकडे राज्यकर्त्यांचा कल झुकला होता, जो अद्याप कायम आहे. विचारधारेतील  परिवर्तनामुळे 'राष्ट्रीय हिताची' परीभाषा सुद्धा बऱ्याच अंशी बदलली आहे. आधी राष्ट्रीय हिताच्या यादीत देशाच्या अखंडत्वासह गरिबी निर्मुलानाला सर्वोच्च प्राधान्य होते. सन १९९१ नंतर देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्याला तेवढेच महत्व देण्यात येत आहे, मात्र गरिबी निर्मूलनाची जागा 'आर्थिक विकासाने' घेतली आहे. आर्थिक विकास झिरपत जाऊन तळागाळाला पोचेल आणि गरिबांचे भले होईल असा आशावाद राज्यकर्त्यांच्या विचारसरणीमध्ये निर्माण झाला आहे. एकंदर, परराष्ट्र धोरण निश्चित करणाऱ्या महत्वाच्या पाचही घटकांमध्ये लक्षणीय बदल घडून आले आहेत. मात्र, त्या प्रमाणात भारताच्या परराष्ट्र धोरणात बदल झालेले नाहीत, जे झाले आहेत ते दूरगामी नाहीत. जुन्या काळातील धोरणाची यथार्थता संपलेली नसून ते आजही तेवढेच योग्य आहे असे म्हणणारे, आणि आधी सगळेच फसले त्यामुळे त्याच्या पूर्ण विरोधी धोरणे अंगीकारणे आवश्यक आहे असा पुरस्कार करणारे, या दोन भूमिकांमध्ये भारताचे परराष्ट्र धोरण फसलेले आहे. याशिवाय, आजच्या वस्तुस्थितीचे योग्य आकलन करत परराष्ट्र धोरणाला नवी दिशा देता येऊ शकते याचा सर्वांगीण विचार करण्याची क्षमता आजच्या धोरणकर्त्यांनी गमावली आहे. परिणामी, भारतावर, अफगाणिस्तानात पाकिस्तानवर अंकुश ठेवणारा प्यादा किव्हा आशियामध्ये चीन विरुद्ध उपयोगी येऊ शकेल असा 'बळीचा बकरा' बनण्याची वेळ आली आहे. शीत युद्धानंतर बदललेल्या परिस्थितीत आणि भारताच्या स्वत: वाढलेल्या शक्तींमुळे जागतिक राजकारणात वेगळे स्थान निर्माण करण्याची संधी होती आणि आहे. मात्र, राज्यकर्त्यांची परिस्थितीचे आकलन करण्यातील अक्षमता, राष्ट्रीय हित परिभाषित करण्यातील अपयश, देशाच्या बलस्थानांबद्दल गमावलेला आत्मविश्वास आणि विचारधारेची कमतरता यामुळे परराष्ट्र धोरणाला प्रभावी वळण देण्यात अपयश आले आहे. संकुचित पक्षीय राजकारणातून थोडा वेळ काढत परराष्ट्र धोरणावर गांभीर्याने चर्चा करण्याची सर्वच राजकीय पक्षांना गरज आहे, 'पण लक्षात कोण घेतो?' असे म्हणण्याची आता वेळ आली आहे.