Showing posts with label Bonn Afghan India pakistan NATO US Karzai Taliban. Show all posts
Showing posts with label Bonn Afghan India pakistan NATO US Karzai Taliban. Show all posts

Thursday, April 19, 2012

अफगाणिस्तानचा रक्तरंजित वसंत

तालिबान आणि हक्कानी गटाने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिकेसह दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील देशांना चक्रावून टाकले आहे. काबुलसह अफगाणिस्तानात ३ इतर ठिकाणी सशस्त्र हल्ले केल्यानंतर तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की नाटो-विरोधी गटांकडून लवकरच सुरु करण्यात येणार असलेल्या 'वासंतिक आक्रमणाचा' (Spring Offensive) संदेश देण्यासाठी हे हल्ले चढवण्यात आले आहेत. नजीकच्या भविष्यात काबुलवर ताबा मिळवणे शक्य नसले तरी, करझाई यांच्या सुरक्षा यंत्रणेला राजधानीच्या रक्षणात गुंतवून अफगाणिस्तानच्या इतर प्रांतांमध्ये आपले समांतर सरकार स्थापन करायचे हा तालिबानच्या 'वासंतिक आक्रमणामागचा' उद्देश स्पष्ट आहे .
काबुलवरील नव्या तालिबानी हल्ल्यांच्या आठवडाभर आधी अफगाणिस्तानच्या विशेष सुरक्षा फौजांनी कुनार प्रांतातील पाकिस्तानधार्जिण्या दहशतवादी गटांविरुद्ध मोहीम हाती घेत लक्षणीय यश मिळवले होते. याची दखल घेत तालिबानच्या नेतृत्वाने म्हटले होते की 'आतापर्यंत तालिबानचे प्रमुख लक्ष्य नाटो-सैन्य होते. मात्र गेल्या काही दिवसात अफगाणी राष्ट्रीय सैन्याने तालिबानची मोठी हानी केल्यामुळे आता त्यांच्याविरुद्ध मोर्चा वळवणे भाग आहे." अमेरिकेच्या द्रोण हल्ल्यांमुळे मुल्लाह उमरच्या नेतृत्वाखालील तालिबानची मधली फळी विस्कळीत झाली असली तरी अफगाणिस्तानात सर्वत्र हल्ले करण्याची त्यांची क्षमता अद्याप शाबूत आहे. पाकिस्तानातील मूलतत्ववादी घटकांच्या सहाय्याने तालिबान आणि हक्कानी गटाने अफगाणिस्तानच्या पूर्व आणि दक्षिण भागातील डोंगराळ प्रदेशांवरील आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. या भागातील नाटोच्या आक्रमक मोहिमांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तालिबानी आणि हक्कानी पाकिस्तानच्या वायव्य भागात शरण घेत असल्याने १० वर्षांच्या युद्धानंतरही त्यांचा बंदोबस्त करणे अमेरिकेच्या नेतृत्वातील बहुराष्ट्रीय सैन्याला शक्य झालेले नाही. जलालुद्दीन हक्कानी आणि त्याचा मुलगा सिराजूद्दिन हक्कानी यांच्याकडे अंदाजे १०,००० दहशतवाद्यांची फौज असल्याचा गुप्तचरांचा कयास असून, करझई यांच्या सरकारला सगळ्यात मोठा धोका पाकिस्तानात पाळे-मुळे असलेल्या हक्कानी गटाकडून असल्याचे सांगितले जाते.
सध्याच्या अमेरिकी योजनेनुसार, सन २०१४ मध्ये नाटो सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेणार आहे. त्यानंतर, नाटोचे फक्त १५,००० सशस्त्र सैनिक अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सैन्याच्या मदतीसाठी तैनात असतील. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सैन्याची सध्याची २,४०,००० ची बळसंख्या कमी करत १,९०,००० सैन्यसंख्येवर स्थिरावण्याचा पश्चिमी राष्ट्रांचा प्रस्ताव आहे. अफगाणिस्तानच्या एकूण जीडीपी ची ८०% होईल, एवढी रक्कम नाटोच्या नेतृत्वातील बहुराष्ट्रीय सैन्यावर दर वर्षी खर्च होते आहे. सन २०१४ नंतर, अफगाण सैन्याने पूर्णपणे नाटोचे स्थान घेतल्यानंतर हा खर्च कसा भागणार या विवंचनेत करझई यांचे सरकार आहे. अफगाणिस्तानचे स्वत:चे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत अत्यंत मर्यादित असल्याने राष्ट्रीय सैन्याच्या प्रशिक्षणासाठी आणि देखरेखीसाठी त्यांची भिस्त परकीय सहाय्यावर आहे. या दृष्टीने अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझई भारतासह इतर देशांशी करार करत आहेत, जेणे करून नाटो सैन्याच्या माघारीनंतर दहशतवाद विरोधी मोहिमांना खीळ बसणार नाही. मात्र, भरघोस परकीय सहाय्य मिळाले तरी अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सैन्य कितपत टिकाव धरू शकेल याबाबत सगळेच साशंक आहेत. तालिबान आणि हक्कानी गटाने मागील आठवड्यात केलेल्या हल्ल्यांचा अफगाणी फौजांनी यशस्वी सामना केला असला, तरी त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची आणि देशभक्तीची भावना कितपत जागृत होऊ शकेल हे सांगणे कठीण आहे. परिस्थिती विपरीत होत गेल्यास राष्ट्रीय सैन्याचे वांशिक आधारावर विभाजन होऊन अफगाणिस्तानातील यादवीत भर पडण्याची भीती अनेक तज्ञ व्यक्त करत आहेत. येत्या दिवसांमध्ये, पाकिस्तानची कुटनीती, तालिबान आणि हक्कानी गटाला हाताशी धरून, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सैन्यात फुट पाडण्याच्या दिशेने कार्यरत असणार हे नक्की. साहजिकच, यात पाकिस्तानला यश आल्यास ते भारताच्या हिताचे असणार नाही. अफगाणिस्तानच्या काही प्रदेशांवर पाकिस्तानधार्जिण्या मूलतत्ववादी गटांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यास, भारतविरोधी लष्कर-ए-तोईबा सारख्या जहाल दहशतवादी संघटनांना सदस्य-भरती आणि प्रशिक्षणासह हिंसक कारवायांच्या योजना आखण्यासाठी मोकळे रान मिळू शकते. मागील काही वर्षांपासून, अफगाणिस्तानातील कुनार प्रांतात लष्कर-ए-तोईबाचे दहशतवादी तालिबानच्या मदतीने नाटो सैन्याविरुद्ध हिंसक कारवाया करत आहेत. नाटोच्या माघारीनंतर आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सैन्य कचखाऊ ठरल्यास, त्यांच्या हिंसक कारवायांचा ओघ काश्मीरसह संपूर्ण भारताकडे वळण्याची शक्यता आहे. भारताप्रमाणे, रशिया, इराण, चीन आणि मध्य आशियातील अफगाण सीमेवरील देश, सन २०१४ नंतर त्यांच्या ताटात काय वाढून ठेवले आहे या चिंतेने ग्रस्त आहेत. अफगाणिस्तानात अमेरिकेच्या सैन्यतळाला सातत्याने विरोध करणारे हे देश, नाटोने अफगाणिस्तानातील यादवी न सावरता निघून जाऊ नये असे भूमिका घेत आहेत.
दुसरीकडे, तालिबानला नेस्तनाबूत करण्यात यश मिळत नसल्याने त्यांच्याशी जुळवून घ्यावे या मतप्रवाहाने गेल्या वर्षभरापासून अमेरिकेचे धोरण प्रभावीत झाले आहे. अल-कायदाशी संबंध नसलेले ते 'चांगले तालिबान' आणि अल-कायदाशी संबंध न तोडणारे ते 'दुष्ट तालिबान' अशी विभागणी अमेरिकेने केली आहे. सुरुवातीला अफगाण राष्ट्राध्यक्ष करझई, तसेच भारतानेसुद्धा, तालिबान्यांमध्ये असा फरक करण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, काही काळातच त्यांना तालिबानशी बोलणी करण्याच्या अमेरिकी प्रयत्नांना दुजोरा द्यावा लागला. विशेषत: माजी अफगाण राष्ट्राध्यक्ष रब्बानी यांची, शांती-वार्ता करण्यासाठी आलेल्या तालिबानी दूताने आत्मघातकी हल्ल्यात हत्या केल्यानंतर, पाकिस्तान आणि त्यांच्या प्रभावाखालील तालिबानला विश्वासात घेतल्याशिवाय देशात शांतता नांदणे कठीण आहे असे करझई यांचे मत पक्के झाले. परिणामी, मागील काही महिन्यांपासून करझई यांच्या प्रशासनात पाकिस्तानी व्यवस्थेशी सलगी असलेल्या व्यक्तींचे महत्व वाढले आहे.
तालिबानच्या काही गटांशी अमेरिकेला चर्चा करता यावी या दृष्टीने कतार देशाची राजधानी, डोहा इथे तालिबानचे अधिकृत कार्यालय उघडण्याची सोय करण्यात आली. मात्र, या तथाकथित 'चांगल्या तालिबान्यांनी' अफगाणिस्तानच्या सध्याच्या राज्यघटनेस मान्यता देण्याचे नाकारले आहे. सन २०१४ मध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील सहभागाबद्दल त्यांच्याकडून अफगाण सरकारला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. मागील दोन्ही निवडणुकांवर तालिबानने बहिष्कार टाकला होता. तालिबानने, 'चर्चेसाठी विश्वासाचे वातावरण तयार करण्यासाठी', अमेरिकेच्या ताब्यातील आपल्या ५ सहकार्यांच्या सुटकेची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्यासंबंधात मतभेद होऊन, मार्च महिन्यात डोहा इथे झालेली अमेरिका आणि तालिबान दरम्यानची पहिली चर्चा फिस्कटली आणि शांती-प्रक्रियेचे भवितव्य अधांतरी लटकले. दुसरीकडे, अफगाण सरकारने तालिबानशी चर्चा करण्यासाठी सौदी अरेबियाची निवड केली आहे. त्यांच्यामधील चर्चेची पहिली फेरी सुद्धा निष्फळ ठरली आहे. या पार्श्वभूमीवर, तालिबानशी चर्चा करण्याबाबत अमेरिकेच्या राजकीय क्षेत्रात असलेल्या मतभेदांना खतपाणी घालण्यासाठी हक्कानी सारखे गट दहशतवादी हल्ले चढवतील अशी शक्यता होती आणि ती खरी ठरली. सन २०१४ नंतर अफगाणिस्तानात मोकळे रान मिळण्याची आशा असल्याने अमेरिका आणि करझई सरकारशी तालिबान समझोता करणे टाळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गेल्या वर्षी सैन्य-परतीची जाहीर घोषणा केल्यानंतर टीकाकारांनी हाच मुद्दा मांडला होता की नाटो फौजा अफगाणिस्तानातून काढता पाय घेणार हे निश्चित ठाऊक असतांना तालिबान सहकार्याची भूमिका घेईन हा भाबडा आशावाद आहे. एकंदरीत आता अमेरिकेची, तसेच राष्ट्राध्यक्ष करझई यांची अवस्था बिकट झाली आहे. तालिबानशी चर्चेस सुरुवात करून त्यांनी मागील १० वर्षात समर्थन प्राप्त केलेल्या तालिबान-विरोधी गटांची नाराजी ओढवली आहे.
अफगाणिस्तानच्या राजकारणावर ढोबळपणे, पारंपारिक वांशिक-आदिवासी गटांचे नेते, १९७० आणि १९८० च्या दशकांत साम्यवादी राजवटीविरुद्ध लढणारे मुजाहिद्दीन गट आणि १९८० च्या दशकात अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने उभे केलेले तालिबानी गट, अशी ३ गटांची पकड आहे. मागील १० वर्षात करझई यांनी, पारंपारिक वांशिक गटाचे नेते आणि तालिबानविरोधी मुजाहिद्दीन गटांशी समन्वय साधत, आपले स्थान टिकवून ठेवले आहे. मात्र, तालिबानने पारंपारिक वांशिक-आदिवासी नेत्यांची हत्या करण्याचे धोरण राबविले असतांना, त्यांचाशी समझोता करण्याचे प्रयत्न करझई राजवटीच्या विरोधात जाऊ शकतात. मागील एक वर्षात कंदहार प्रांतात तालिबानने १५० हून अधिक वांशिक-आदिवासी नेत्यांची हत्या केली आहे. त्यामुळे, करझई यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्तून जमातीमध्ये त्यांच्याविरुद्ध रोष आहे. तालिबानशी सलगी केल्यास करझई यांना समर्थन देणारे हझारा वांशिक गटाचे नेते मुहाकिक आणि उझबेक वांशिक गटावर प्राबल्य असलेले अब्दुल राशीद दोस्तम नाराज होऊ शकतात. त्यामुळे, करझई सरकारची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी होत चालली आहे.
अमेरिकेमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांमध्ये ओबामा पराभूत होऊन रिपब्लिकन पक्षाची सरशी झाल्यास, नाटो सैन्याचे अफगाणिस्तानातील वास्तव्य आणखी काही काळ वाढू शकते. असे झाल्यास, अफगाण सरकार, तसेच भारत आणि इतर देशांना तालिबानविषयीचे धोरण सुनिश्चित करण्यासाठी आणखी थोडा अवधी मिळू शकतो. मात्र, ओबामांनी घोषणा केल्याप्रमाणे नाटोने सन २०१४ मध्ये माघार घेतल्यास अफगाणिस्तानचा तिढा अधिक गुंतागुंतीचा होणार आहे. त्यावेळची संभाव्य परिस्थिती ध्यानात घेत भारताने आतापासून आपल्या राजनैतिक प्रयत्नांना गती देणे गरजेचे आहे. नाटोच्या माघारीनंतर पाकिस्तानचे लष्कर आणि आई.एस.आई. ला अफगाणिस्तानात मोकळीक मिळू नये ही भारताची प्राथमिकता असणार आहे. या संबंधात पाकिस्तानवर फक्त द्वि-पक्षीय चर्चेतून दबाव आणणे भारतासाठी शक्य नाही. मात्र, अफगाणिस्तानात तालिबानची सरशी होणे ज्या शेजारी देशांच्या हिताचे नाही, त्यांच्या मदतीने पाकिस्तानातील कट्टरपंथी तत्वांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न भारत करू शकतो. या दृष्टीने, "शांघाई कोऑपरेशन ओर्गनाइज़ेशन" या चीन, रशिया आणि मध्य आशियातील ४ देशांचा समावेश असलेली संघटना तसेच भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण असे एकूण १० देशांचे व्यासपीठ तयार करण्यासाठी युपीए सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. अन्यथा, अफगाणिस्तानातील 'रक्तरंजित वसंता'ची झळ भारतापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही.

Tuesday, December 13, 2011

बॉन परिषदेची निष्पत्ती

अमेरिका आणि नाटो (NATO) साठी अफगाणिस्तान समस्या 'गिळताही येत नाही आणि तोंडातून बाहेर काढताही येत नाही' अशी गळ्यात फसलेल्या हड्डी सारखी झाली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी, निवडणुकीत अमेरिकी जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार, २०१४ पर्यंत नाटोची अफगाणिस्तानातील सशस्त्र मोहीम गुंडाळण्याचा ध्यास घेतल्याने त्यानंतर या युद्धग्रस्त देशाच्या भविष्यावर चिन्तन करून मदत कार्याची रूपरेषा ठरवण्यासाठी जर्मनीतील बॉन इथे ८५ देश आणि संयुक्त राष्ट्रसहित १६ आंतरराष्ट्रीय संस्थांची परिषद डिसेंबर २०११ रोजी संपन्न झाली. १० वर्षांपूर्वी नाटोने तालिबानची काबुलमधून हकालपट्टी केल्यानंतर अफगाणिस्तानची सुरक्षा आणि आर्थिक बांधणीसाठी आंतरराष्ट्रीय सहयोग स्थापन करण्यासाठी २००१ मध्ये बॉन इथेच पहिली अफगाणिस्तान परिषद भरवण्यात आली होती. त्या वेळी विविध देशांनी दिलेल्या आश्वासनांना उजळणी देण्यासाठी आणि पुढील वाटचालीचा दृढ संकल्प जाहीर करण्यासाठी परत बॉन इथेच परिषद बोलवावी अशी सूचना अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी केल्यानंतर जर्मनीने लगेचच ते यजमानपद स्वीकारले आणि करझाई यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी बॉन परिषद संपन्न झाली.

२००१च्या पहिल्या बॉन परिषदेच्या वेळेस असलेला पाश्चिमात्य देशांचा उत्साह २०११च्या दुसऱ्या बॉन परिषदेपर्यंत पार मावळला होता. या वर्षीच अमेरिकेला ओसामा-बिन-लादेनला ठार मारण्यात यश आले असले तरी मागील १० वर्षांमध्ये तालिबानचा समूळ नायनाट करण्यात आलेले अपयश आणि अफगाणिस्तानच्या अंतर्गत राजकीय प्रक्रियेने पाळेमुळे पकडणे या दोन गोष्टींमुळे नाटोने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तिथे स्थैर्य नांदेल याची कुणालाच खात्री नाहीय. उलट हा देश परत एकदा गृह युद्धाच्या खाईत पडण्याचीच शक्यता सगळ्यांनी गृहीत धरली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातून सैन्य-माघार जरी घेतली तरी काबुलमध्ये मैत्रीपूर्ण सरकार कायम राहावे यासाठी नाटोचा आटापिटा चालला आहे. या दृष्टीने दुसऱ्या बॉन परिषदेतून खरे तर नवे असे काहीच निष्पन्न झाले नाही. तिथे स्थैर्य नांदेपर्यंत आंतरराष्ट्रीय समुदाय काबुलमधील करझाई सरकारला भरघोस सहकार्य सुरु ठेवणार या नोंदीवर बॉन परिषदेची सांगता झाली. मात्र अफगाणिस्तानात शांतता नांदावी यासाठी अफगाण गटांमध्ये चर्चा सुरु करण्याच्या दिशेने कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे या परिषदेचा अफगाणिस्तानातील अंतर्गत राजकारणावर काडीचाही परिणाम झाला नाही. अफगाणिस्तानातील युद्धरत गटांना चर्चेसाठी एकत्र आणण्याच्या उद्देशाने बॉन परिषदेत तालिबानच्या काही गटांना निमंत्रण देण्याच्या आवया अधूनमधून उठत होत्या. मात्र प्रत्यक्षात ही परिषद तालिबानच नाही तर पाकिस्तानच्याही अनुपस्थितीत पार पडली. परिषदेच्या काही दिवस आधीच अफगाणिस्तानातील नाटो तुकडीने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे २४ जवान ठार झाल्यामुळे पाकिस्तानात एकच गदारोळ माजला आणि या घटनेच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या सरकारने बॉन परिषदेवर बहिष्कार घातला.

मात्र या बहिष्काराने पाकिस्तानने फारसे काही साध्य केले नाही. उलट बॉन परिषदेत अनुपस्थित राहत पाकिस्तानने अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांची नाराजीच ओढवून नाही घेतली तर पाकिस्तानला वगळून कश्या पद्धतीने अफगाणिस्तानचा तिढा सोडवता येईल या दृष्टीने नाटोला विचार करण्यास भागही पाडले आहे. अफगाणिस्तानच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याची पाकिस्तानची क्षमता गेल्या काही वर्षांमध्ये कमालीची वाढली आहे. याला कारण आहे तालिबानचे वाढते वर्चस्व आणि अफगाणी शांतता प्रक्रियेत तालिबानला सहभागी करून घेण्याबाबत महत्वाच्या देशांमध्ये होत असलेले एकमत. तालिबानच्या प्रभावशाली हक्कानी गटाच्या नाड्या पाकिस्तानच्या आईएसआई च्या हाती आहेत. पाकिस्तानला काबुल मधील सरकारमध्ये तालिबानला वाटा मिळवून द्यायचा आहे आणि काही वर्षांनी झालेच तर परत एकदा काबूलमध्ये तालिबानचे एकछत्री सरकार स्थापन करायचे आहे. पुढील वर्षीपासून नाटो सैन्याची माघार सुरु झाल्यानंतर पाकिस्तानच्या प्रेरणेने तालिबान काबुलकडे आगेकूच करण्याची शक्यता आहे. या साठी अफगाणिस्तानशी असलेल्या सुमारे २५०० की.मी. सीमेचा पाकिस्तान धूर्तपणे वापर करत आहे.

अमेरिकेला तालिबानशी बोलणी तर करायची आहे पण ती तालिबान वर्चस्वाच्या स्थितीत असतांना नाही. तालिबानला जेरीस आणून त्यांच्याशी वाटाघाटी करायची अशी अमेरिकेची भूमिका आहे आणि त्यासाठी पाकिस्तानने तालिबानला मदत बंद करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी अमेरिकेची इच्छा आहे. मात्र पाकिस्तान या संदर्भात दुटप्पी भूमिका घेत आहे. तालिबानचे कंबरडे मोडल्यास अमेरिकेला पाकिस्तानची गरजच उरणार नाही याची पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना जाणीव आहे. विशेषत: पाकिस्तानी लष्कराला हे ठाऊक आहे की सक्षम तालिबान म्हणजे अमेरिकी मदतीची हमी आणि अफगाणिस्तानच्या राजकारणातील वाढलेले वजन. पाकिस्तानच्या या दुटप्पी वागणुकीने ओबामा प्रशासनाला पुरते जेरीस आणले आहे. पाकिस्तानचे पूर्ण तालिबानीकरण होऊ नये म्हणून पाकिस्तानशी सरळसरळ वैरही घ्यायचे नाही मात्र पाकिस्तान पुरेसे सहकार्यही करत नाही अश्या कात्रीत अमेरिका सापडली आहे. या पुढे अमेरिका आणि नाटोने पाकिस्तानला डावलून अफगाणिस्तानातील डावपेच आखायला सुरुवात केल्यास पाकिस्तान तोंडघशी पडणार हे नक्की. मात्र अजूनही पाश्चिमात्य देश हे धाडस दाखवण्याच्या मनस्थितीत नाही. संधी आहे पण इच्छाशक्ती नाही अशी आता नाटोची स्थिती झाली आहे.

पाकिस्तानचा अफगाणिस्तानातील प्रभाव रोखण्यासाठी भारतानेही प्रयत्नांना धार आणली आहे. या दृष्टीने काबुल मधील तालिबान विरोधी सरकार आणि वांशिक गटांशी आर्थिक संबंध मजबूत करण्याबरोबरच अफगाणिस्तानच्या प्रशासनिक विकासामध्ये भारत भरघोस योगदान देत आहे. आजच्या स्थितीला नाटो, भारत, पाकिस्तान यांच्याशिवाय चीन, इराण आणि रशिया यांचे हितसंबंध अफगाणिस्तानात गुंतलेले आहेत. अफगाणिस्तानातील शिया गटांना इराणचे सहकार्य आहे. इराणला अफगाणिस्तानात अमेरिकेची उपस्थिती तर नकोच आहे पण तालिबानचा प्रभाव ही नको आहे. चीन आणि रशिया प्रत्यक्षपणे अफगाणिस्तानातील वादात गुंतलेले नसले तरी त्यांना अमेरिका आणि नाटोची दीर्घकाळ उपस्थिती नको आहे आणि शिवाय अनेक प्रस्तावित गैस पाईपलाईन्स अफगाणिस्तानातून येत असल्याने त्यांना काबूलमध्ये मैत्रीपूर्ण सरकार हवे आहे. अफगाणिस्तानातील वांशिक संघर्षाचा परिणाम मध्य आशियातील पूर्वाश्रमीच्या सोविएत अधिपत्त्यातील आणि आता इस्लामिक सरकारे असलेल्या देशांवर सुद्धा होतोच. त्यामुळे रशियाला अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये असेच वाटते. प्रभावशाली तालिबानमुळे चीनच्या मुस्लिमबहुल प्रदेशांमध्ये दहशतवादाच्या आणि फुटीरतेच्या घटनांना जोर येऊ शकतो अशी भीती चीनला आहे.

थोडक्यात, अफगाणिस्तानात स्थैर्य नांदणे हे हितसंबंध गुंतलेल्या सगळ्याच देशांच्या हिताचे आहे. मात्र अफगाणिस्तानात मैत्रीपूर्ण सरकार असेल तरच स्थैर्य उपयोगी पडणार आणि त्या दिशेने प्रत्येकाने प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे फासे फेकण्यास सुरुवात केलेली असल्याने बॉन परिषदची निष्पत्ती म्हणजे केवळ एक फार्स ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.

(Date: 9th Dec. 2011)